फडणवीसांनी तात्काळ राजीनामा द्यावा; राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
पेढे वाटणाऱ्या, फटाके फोडणाऱ्या मुख्यमंत्र्यात माणुसकीच राहिलेली नाही : खा.प्रणिती शिंदें
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. तसेच, सोलापुरात तीन दिवसांत दहा मर्डर झाले आहेत. सोलापूरसह संपूर्ण राज्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
नसरापुरातील अत्याचाराचं प्रकरण घडलेले असताना आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जल्लोष करतात, पेढे वाटतात, त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात काही माणुसकीच राहिली नाही, असं मला वाटतं, असा गंभीर आरोपही खासदार शिंदे यांनी केला.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, नसरापुरातील नराधमाने चिमुकलीवर अत्याचार करून तिचा अत्यंत निर्घृणपणे खून केला. शक्ती कायदा लागू केला असता त्याला पंधरा दिवसांत फाशी झाली असती. त्याला लवकरात लवकर फाशी द्यावी, अशी आमची मागणी आहे. पण, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जल्लोष करून पेढे वाटले, त्यावरून स्पष्ट हेातं की 'पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून भाजप कार्यकर्त्यांपर्यंत सर्वाजण निवडणुकीसाठीच काम करतात. त्यांच्यासाठी निवडणुका हेच सबकुछ आहे.
चिमुकलीवर अत्याचार होऊन वाईट पद्धतीने तिचा खून केला जातो, त्याची आठवण ठेवून भाजपने जल्लोष केला नसता. तसेच, चिमुकलीसाठी आम्ही जल्लोष करत नाही, असं म्हणाला असता तर तुमच्यात थोडीतरी माणुसकी शिल्लक आहे, असं आम्हाला वाटलं असतं. त्याउलट तुम्ही जल्लोष केला आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनाचे कार्यक्रम घेतले, असा आरोपही शिंदे यांनी केली.
त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही माणुसकीच राहिली नाही, असं मला वाटतं. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. नसरापूरची केवळच एकच घटना नाही तर सोलापुरात तीन दिवसांत दहा मर्डर झाले आहेत. कुठाय तुमचं प्रशासन, कुठाय तुमची कायदा आणि सुव्यवस्था?
फडणवीस यांना गृहविभाग सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्यावा किंवा दुसऱ्याकडे गृहखातं सोपवावं. त्या नराधमाचा फोटो पाहिल्यानंतर वाटतं की त्याला तिथंच काहीतरी करावं. त्याचे नातेवाईकही म्हणतात, आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही कायदा हातात घेतो. म्हणजे आता डोक्यावरून पाणी गेलं आहे, अशी खंतही प्रणिती शिंदे यांनी बोलून दाखवली.
त्या म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारने आणलेला शक्ती कायदा लागू करा. त्याची तुम्हाला कसली भीती आहे. पोक्सो अंतर्गत महिलांची ओळख सांगू शकत नाही. मात्र, सोलापुरात ते खुलेआम जाहीर केलं गेलं आहे. प्रशासनाच्या समोर या घटना घडतायत, त्यामुळे त्यांचीही मिलीभगत आहे.
नसरापूरमधील नराधमला फाशी झाली पाहिजे, शक्ती कायदा लागू करा. या नराधमावर पोक्सोच्या 2 ते 3 केसेस आहेत, हा सुटला कसा. एक महिला प्रतिनिधी म्हणून त्याचं वाईट वाटतं, अशी खंतही प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली.
त्या म्हणाल्या, सत्तर फुट रोडसारख्या ठिकाणी मर्डर होतो, इतकी कायदा आणि सुव्यवस्था कोलमडून पडली आहे. फक्त इलेक्शन आणि हवरटपणा सुरू आहे. फक्त इलेक्शनदरम्यान गुन्हे दाखल होतात. सध्या शहरात मटका आणि इतर अवैध धंदे जोरात सुरू आहेत.
सत्ता त्यांची, प्रशासन त्यांच तरीसुद्धा त्यांना आमच्या सोबत येऊन विरोध दाखवावा लागतोय. कुठे नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र, फक्त खिसे कसे भरायचं एवढंच सत्ताधाऱ्यांचे सुरु आहे. प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर दबाव असल्याने अधिकारी हे कॉम्प्रोमाईज झाले आहेत, असा आरोपही प्रणिती शिंदे यांनी केला.

No comments:
Post a Comment