अवकाळी पावसाचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-माढा आणि करमाळा तालुक्यातील कंदरसह परिसराला बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला. या अवकाळी पावसामुळे आंबा, चिकू आणि केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.
दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सायंकाळी अचानक बदललेल्या वातावरणाचा सामना करावा लागला. सुमारे पाचच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले आणि सहाच्या सुमारास तुफानी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक मोठी झाडे उन्मळून पडली, तर घरांवरील पत्रे उडून गेली.
आंबा आणि चिकूच्या बागांमध्ये फळांचा सडा पडल्याचे चित्र दिसून आले. त्यानंतर झालेल्या गारपिटीमुळे रस्त्यांवर पांढरी चादर पसरल्यासारखे दृश्य निर्माण झाले होते. या अवकाळी पावसामुळे उसाला मात्र काही प्रमाणात दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
सातोली येथील सुरेश गाडे, शिवाजी गाडे आणि अशोक गाडे यांच्या केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. कंदर, केम, वशिणे, उपळवाटे आदी गावांमध्येही जोरदार पावसाने हानी केली असून गंधर्व सातवली परिसरात चक्रीवादळासारख्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

No comments:
Post a Comment