पंढरपूर कॉरिडॉरविरोधात दुचाकी फेरी; शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पंढरपूर (कटूसत्य वृत्त) :- शासनाच्या ताब्यातील शेकडो एकर जागा पडिक असताना सर्वसामान्यांची घरे पाडून विकास करण्याचा प्रयत्न कितपत नैतिक आहे, असा सवाल तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर यांनी उपस्थित केला. संभाव्य पंढरपूर कॉरिडॉरला विरोध दर्शविण्यासाठी बुधवारी समितीच्या वतीने दुचाकी फेरी काढण्यात आली.
या फेरीद्वारे शहरातील विविध शासकीय व मोकळ्या जागांची पाहणी करून, त्या जागांचा विकासासाठी उपयोग करता येऊ शकतो, हे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. खादी ग्रामोद्योग येथील मोकळ्या जागेपासून सुरू झालेल्या या फेरीने लोटेवाडी म्हसोबा, फटाका स्टॉल मैदान, जिजामाता उद्यान, टिळक स्मारक, जुने न्यायालय, हनुमान मैदान, नगरपालिका दवाखाना, जुनी नगरपरिषद इमारत, लोकमान्य हायस्कूलची जुनी इमारत, लिमयेवाडा, सातमजली दर्शन मंडप परिसर, स्मशानाजवळील आगामी दर्शन मंडप, संत गजानन महाराज पिछाडीचे वाहनतळ, संत गाडगे महाराज चौक, एमटीडीसी भक्तनिवास, ब्लड बँक परिसर, पद्मावती उद्यान आदी ठिकाणांची पाहणी केली.
पाहणीनंतर या सर्व जागांचा अहवाल प्रांताधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला. यावेळी इचगावकर म्हणाले की, अनेक शासकीय जागा वर्षानुवर्षे विनावापर पडून आहेत. त्यांचा सुयोग्य वापर करून विकास आराखडा तयार करण्याचा प्रस्ताव वारकरी संप्रदाय पाईक संघ, तीर्थक्षेत्र बचाव समिती व संतभूमी बचाव समिती यांच्या वतीने शासनाला देण्यात आला असून, त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.
या दुचाकी फेरीत सुमारे ५०० हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. ह.भ.प. माउली महाराज गुरव, ह.भ.प. वडगावकर महाराज, बाबाराव महाजन-बडवे, चंद्रकांत निकते, वैभव बढवे, व्यंकटेश कुलकर्णी, अनिल गवळी, गणेश लंके, महेश काळे, वैभव कुंभारे, सतीश मुळेवाडीकर, संतोष हिलाळ, डॉ. प्राजक्ता बेणारे, सुलभा वट्टमवार आदींसह कॉरिडॉरविरोधी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
.png)
No comments:
Post a Comment