ग्रामीण भागातील भारनियमन थांबवून पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करा – खा. प्रणिती शिंदे आक्रमक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-महावितरणकडून ग्रामीण भागात सुरू असलेल्या वीज भारनियमनामुळे शेतकरी व पशुपालक मोठ्या अडचणीत सापडले असून, त्यांना शेती व दैनंदिन गरजांसाठी आवश्यक वीजपुरवठा मिळत नाही. त्यामुळे महावितरणने तातडीने ग्रामीण भागातील भारनियमन थांबवून पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करावा, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
जिल्ह्यातील मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्यांमध्ये अपुरा व अनियमित वीजपुरवठा होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. वारंवार होणाऱ्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांना पाणी उचलण्यात अडचणी येत असून शेती उत्पादनावर परिणाम होत आहे. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार शिंदे यांनी महावितरण प्रशासनाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधत ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत असलेल्या परिणामांची गंभीर दखल घेतली आहे. ग्रामीण भागात वारंवार बंद पडणाऱ्या वितरण ट्रान्सफॉर्मर (डीपी) ची तत्काळ दुरुस्ती करावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.
शेतकरी व नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन सध्याच्या भारनियमनात तातडीने कपात करून नियमित व अखंड वीजपुरवठा सुरू करावा, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मोहोळ तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन खासदार प्रणिती शिंदे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रत्येक ठिकाणी वीज भारनियमनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. यानंतर त्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांना निवेदन दिले. भारनियमन तातडीने बंद न केल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मोहोळ तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी यांनी दिला.

No comments:
Post a Comment