जनहित शेतकरी संघटनेच्या मागणीला यश
आंदोलन मागे घेण्याचे तहसीलदारांचे आवाहन
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर ऊर्फ दिनकर (भैय्या) देशमुख यांनी केलेल्या मागण्यांना यश मिळाले असून प्रशासनाने त्याची दखल घेत पंचनामे करण्यास सुरुवात केली यामुळे प्रभाकर देशमुख यांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे.
मोहोळ तालुक्यात गेल्या 25 दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टी, चक्रीवादळ व गारपीटीमुळे पेनूर, कोन्हेरी येवती, खंडाळी, पापरी, देवडी, सोहाळे यांसह सुमारे १२ गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळबागा व शेतीपिकांचे नुकसान होण्याबरोबरच काही नागरिकांच्या घरांचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.या नुकसानीबाबत संबंधित प्रशासनाने पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू केली असून नुकसानभरपाईसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. मार्च व एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अहवाल जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पाठविण्यात आले असून एप्रिलमधील पंचनामे लवकर पूर्ण करून अनुदान मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, सिना, भोगावती व नागझरी नद्यांना आलेल्या पुरामुळे वाळुज, देगाव, एकरुखे, मलिकपेठ, नरखेड, अर्जुनसोड, कोळेगाव, डिकसळ, मुंढेवाडी, नांदगाव, लांबोटी, सावळेश्वर, विरवडे (बु.), वडवळ, रामहिंगणी, घाटणे, भोयरे आदी गावांतील शेतजमिनीतील माती वाहून गेली आहे. या नुकसानीसंदर्भात मदतीची मागणी करण्यात आली असून महाडीबीटी पोर्टलद्वारे २ हेक्टरपर्यंतच्या खातेदारांना अनुदान वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांसाठी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच पुरातून सावरण्यासाठी पूरग्रस्त शेतकऱ्यांना दोन लाख बिनव्याजी कर्ज दहा वर्षाच्या परतफेडीवर द्यावे अशी पण मागणी जनहित शेतकरी संघटनेची असल्यामुळे त्याच्या अनुषंगाने तहसीलदार मुळीक साहेब यांनी शासनाकडे कळवले असल्याचेही व त्याबाबत मंत्रालयात मी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचेही प्रभाकर देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
घरपडझडीच्या नुकसानासाठी सुमारे ३४.२३ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून संबंधित लाभार्थ्यांचे अचूक खातेक्रमांक मिळताच त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
तसेच शेतकऱ्यांना १० वर्षांच्या परतफेडीवर बिनव्याजी कर्ज देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रशासनाकडून सुरू असलेल्या या कार्यवाहीमुळे शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष नाना मोरे, विजय तळेकर, गणेश चवरे, शिवाजी जाधव, पिंटू पवार, तानाजी मोठे, समाधान चवरे, भैय्या थोरात, मंगेश अभिवंत, विनायक भोसले, विष्णू भोसले, बाबा कारंडे, विशाल गवळी इत्यादी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment