फडणवीस-आठवले साहेबांच्या पुढाकाराने 'महाड चवदार तळे' विकासकामांना गती!
डॉ.हुलगेश चलवादी यांनी मानले राज्य सरकारचे आभार
दिनांक (कटूसत्य वृत्त):- दलितोद्धार चळवळीतील ऐतिहासिक पर्व ठरलेल्या महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष नुकतेच सुरू झाले आहे. राज्य सरकारने यानिमित्ताने चवदार तळे सुशोभीकरण व जलशुद्धीकरण प्रकल्पाचे केलेले भूमिपूजन राज्यातील तमाम आंबेडकरी अनुयायांसाठी अभिमानास्पद बाब ठरतेय. केंद्रीय राज्यमंत्री मा.रामदास आठवले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना मिळालेले हे विशेष यश आहे; अशा शब्दात आरपीआयचे नेते, माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांनी शुक्रवारी (ता.२७) राज्य सरकारचे आभार मानले.
सुमारे ५५.८० कोटी रुपयांच्या निधीतून साकार होणाऱ्या या प्रकल्पामुळे महाडच्या ऐतिहासिक वारशाला नवसंजीवनी मिळेल. या प्रकल्पामध्ये तळ्याचे जलशुद्धीकरण, परिसराचे आकर्षक सुशोभीकरण तसेच पर्यटनवृद्धीसाठी आवश्यक सुविधा उभारल्या जाणार आहेत. स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही त्यामुळे मोठा लाभ होईल, असा विश्वास डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला. येत्या काळात राज्य सरकार तळ्याच्या विकासासाठी आणखी निधी देईल, असे देखील डॉ चलवादी म्हणाले.
मा.आठवले साहेबांच्या विशेष प्रयत्नांमुळेच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागला आहे. महामानव डॉ.बासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्याचे आवाहन करत महाडमध्ये ‘शिवसृष्टी’ आणि ‘भीमसृष्टी’ उभारण्याची मागणी देखील साहेबांनी केली आहे. या नाविन्यपूर्ण संकल्पनेचा राज्य सरकार प्रामुख्याने विचार करेल, असा विश्वास डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला.चवदार तळ्याच्या विकासामुळे इतिहास जपत प्रगतीचा मार्ग खुला झाल्याने हा प्रकल्प बहुजन समाजासाठी अत्यंत गौरवास्पद असून सरकारच्या कार्यक्षम नेतृत्वाची ही ठोस झलक असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

No comments:
Post a Comment