कौशल्ययुक्त शिक्षणातूनच रोजगाराच्या संधी उपलब्ध : प्रा. विठ्ठल एडके
युनिक कॉम्प्युटरच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि बक्षीस वितरण समारंभ संपन्न
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पदवीचे शिक्षण घेणे पुरेसे नाही. पदवीसोबतच विद्यार्थ्यांनी संगणक साक्षरता आणि विविध तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज आहे. कारण कौशल्ययुक्त शिक्षण हेच भविष्यात रोजगाराची दारे उघडणारी खरी गुरुकिल्ली ठरणार आहे, असे प्रतिपादन प्रा. विठ्ठल एडके यांनी केले.
स्थानिक युनिक कॉम्प्युटर संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील जनसंवाद विभागातील प्रा. विठ्ठल एडके प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनिक कॉम्प्युटरचे संचालक महादेव कोरे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जयहिंद फूड बँकेचे सतीश तमशेट्टी आणि वैष्णवी निजामुडे मॅडम यांची विशेष उपस्थिती होती.
या वेळी मार्गदर्शन करताना प्रा. विठ्ठल एडके म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून नोकरी मिळवणे आता कठीण झाले आहे. उद्योगांना अशा युवकांची गरज आहे, जे प्रत्यक्ष कामात निपुण आहेत. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य विकास करण्यावर भर दिला पाहिजे. संगणकीय ज्ञान हे आता मूलभूत गरज बनले असून, ज्यांच्याकडे ही कौशल्ये आहेत, त्यांनाच रोजगाराच्या संधी प्राधान्याने उपलब्ध होत आहेत.
यावेळी सतीश तमशेट्टी यांनीही आपले विचार व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशात सातत्य आणि कष्टाचे महत्त्व अधोरेखित केले. युनिक कॉम्प्युटरने राबविलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युनिक कॉम्प्युटरच्या सर्व शिक्षक आणि कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक या सोहळ्याला उपस्थित होते.




No comments:
Post a Comment