‘डिजिटल व्यसन’ गंभीर संकट; दरवर्षी २० हजार मुलांच्या मृत्यूचा दावा
नवी दिल्ली (कटूसत्य वृत्त) – देशात मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये वाढत चाललेल्या डिजिटल व्यसनाचा गंभीर मुद्दा राज्यसभेत उपस्थित करण्यात आला. Derek O'Brien यांनी या समस्येमुळे दरवर्षी सुमारे २०,००० मुले आत्महत्येस प्रवृत्त होत असल्याचा धक्कादायक दावा करत सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
शुक्रवारी राज्यसभेतील शून्य प्रहरादरम्यान बोलताना त्यांनी सांगितले की, विविध अभ्यासांनुसार मुले आणि तरुण दररोज सरासरी आठ तास मोबाईल आणि स्क्रीनवर घालवत आहेत, जे वर्षातील १०० दिवसांहून अधिक कालावधी इतके आहे. यामुळे झोपेचे विकार, चिंता आणि मनःस्थितीतील अस्थिरता वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
डिजिटल वापराच्या जैविक परिणामांबाबत त्यांनी सांगितले की, स्क्रीनचा अतिवापर मेंदूमध्ये ‘डोपामाइन’ वाढवतो, ज्यामुळे त्वरित आनंदाची भावना निर्माण होते आणि त्यातून व्यसनाधीनता वाढते.
या समस्येवर उपाय म्हणून ओ’ब्रायन यांनी काही वैयक्तिक सवयींचा अवलंब करण्याचा सल्ला दिला. यामध्ये फोन वापरण्यापूर्वी स्वतःला ‘का’ हा प्रश्न विचारणे, फोन हातात घेण्यापूर्वी दहापर्यंत मोजणे, मोबाईल वेगळ्या खोलीत चार्ज करणे, झोपण्यापूर्वी किमान दोन तास स्क्रीनपासून दूर राहणे आणि ठराविक काळासाठी ‘साऊंड ऑफ/सायलेन्स’ मोड वापरणे यांचा समावेश आहे.
तसेच, ६८ देशांनी शाळांमध्ये मोबाईल फोनवर बंदी घातल्याचे सांगत भारतातही अशा धोरणांचा विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सरकारने स्क्रीनच्या योग्य वापरासाठी जनजागृती करावी, ऑफलाइन उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे आणि तरुणांच्या मानसिक आरोग्यावर डिजिटल व्यसनाचे परिणाम लक्षात घेऊन व्यापक धोरण आखावे, असे आवाहन त्यांनी केले.
डिजिटल व्यसनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, हा विषय केवळ तांत्रिक नसून सामाजिक आणि आरोग्याशी संबंधित मोठे आव्हान बनत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
No comments:
Post a Comment