राज्यावर अवकाळीचे सावट, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा
मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यात सध्या उन्हाचा चटका वाढलेला असतानाच आता हवामानात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्याच्या अनेक भागांत पावसाची हजेरी लागणार असून, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे.
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, १७ ते २० मार्च या कालावधीत कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तापमानाचा पारा चाळीशी पार
सोमवारी विदर्भातील वाशिममध्ये राज्यातील सर्वाधिक ४०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर दुसरीकडे पुण्यात रात्रीचा पारा १६.४ अंशांपर्यंत खाली आल्याने थंडावा जाणवला. मात्र, आता ढगाळ हवामानामुळे रात्रीच्या उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
गारपीट आणि पावसाचा 'यलो अलर्ट'
गारपीट: बुधवारी (१८ मार्च) अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या सहा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धाराशिव आणि लातूरसह मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर (अहमदनगर), सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.१८ मार्चपासून मुंबईसह कोकणात हलक्या सरी कोसळू शकतात. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना वादळी पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
उकाड्याचा तडाखा कायम
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या उत्तर कोकण पट्ट्यासह नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या १३ जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता कायम राहील. रात्रीच्या वेळी दमट हवामानामुळे उकाडा वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
शेतकरी आणि नागरिकांना आवाहन
राज्यात एकाच वेळी उष्णतेची लाट, अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट उभे ठाकले आहे. याचा मोठा फटका काढणीला आलेल्या पिकांना आणि फळबागांना बसण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत. तसेच नागरिकांनी बदलत्या हवामानामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment