गुरुकुल शिक्षणातून घडतो सर्वांगीण विकास - मकरंद अनासपुरे
मोहोळ (कटूसत्य वृत्त): गुरुकुल पद्धतीचे शिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असून केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता जीवनमूल्ये, संस्कार आणि सामाजिक भान विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मकरंद अनासपुरे यांनी केले.
श्रीकृष्ण गुरुकुल संस्थेचा पाचवा वर्धापन दिन वर्षा उसगावकर आणि विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला खासदार प्रा. ज्योती वाघमारे, माजी आमदार राजन पाटील, ज्येष्ठ नेते शिवानंद पाटील, जि.प. सदस्य सचिन जाधव, अॅड. अर्जुन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रगतिशील शेतकरी रामराव केरबा भोसले पाटील, माजी सभापती जालिंदर लांडे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. दीपक गायकवाड, प्रा. प्रकाश भोसले, सरपंच अंजली भोसले-पाटील आदींचा समावेश होता.
अनासपुरे पुढे म्हणाले की, प्रा. प्रमोद आवताडे यांनी ग्रामीण भागात गुरुकुल शिक्षण पद्धती रुजवून विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची उत्कृष्ट सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यांचा हा उपक्रम राज्यातील शिक्षण संस्थांसाठी आदर्शवत ठरत आहे.
प्रा. प्रमोद आवताडे यांनी सांगितले की, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने पाच वर्षांपूर्वी वाघोली वाडी येथे श्रीकृष्ण गुरुकुलची स्थापना करण्यात आली. पालकांनी दाखविलेल्या विश्वासामुळे आणि अनुभवी शिक्षकवर्गाच्या बळावर संस्थेची प्रगती वेगाने होत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील गरड यांनी केले, तर आभार प्रदर्शन हणमंत निकम यांनी मानले. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment