लोंढेवाडी (कटूसत्य वृत्त): खैराव येथील सीना नदीवरील बंधाऱ्याला दारे नसल्याची गंभीर बाब काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर पृथ्वीराज सावंत यांनी तातडीने त्याची दखल घेत दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामाला आता गती मिळाली असून सावंत यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत कामाची पाहणी केली.
शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य देत पाटबंधारे विभागाशी समन्वय साधून बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सध्या काम सुरू झाले असून त्याचा आढावा घेत सावंत यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
येत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यास मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा निर्माण होणार असून परिसरातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. बंधाऱ्याच्या नादुरुस्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी हे काम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत. बळीराजाच्या श्रमाचे मोल राखण्यासाठी आणि त्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहणार असल्याचे पृथ्वीराज सावंत यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment