अवकाळी पावसाने मोहोळमध्ये शेतीचे मोठे नुकसान
आ. राजू खरे यांचा तात्काळ पाहणी दौरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- २५ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मोहोळ मतदारसंघातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनातून परतताच आमदार राजू खरे यांनी तात्काळ नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला.
या दौऱ्यात द्राक्ष, केळी, मका, डाळिंब व शेवगा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याची वेदना जाणवत असल्याची प्रतिक्रिया आमदार खरे यांनी व्यक्त केली.
यावेळी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करून मदत प्रक्रिया गतीने राबवण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. तसेच वीजपुरवठा आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले.
या कठीण प्रसंगी शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभा असून शासन दरबारातून त्यांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही आमदार खरे यांनी सांगितले.
.png)
No comments:
Post a Comment