- खा. ओमराजे निंबाळकर
नवी दिल्ली (वृत्त सेवा):- संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेल्वे मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर ठाम आणि आक्रमक भूमिका मांडत केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
मराठवाड्याच्या विकासासाठी सक्षम रेल्वे सुविधा अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित करत त्यांनी खालील महत्त्वाच्या मागण्या केल्या:
१. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी 1000 कोटी रुपयाची तात्काळ तरतुद करावी
तुळजापूरला रेल्वेने जोडण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. धाराशिव ते तुळजापूर या मार्गाचे काम सुरू असले तरी तुळजापूर ते सोलापूर हा टप्पा अजूनही निविदा प्रक्रियेत अडकलेला आहे. या संपूर्ण मार्गासाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांची आवश्यकता असून केंद्राने आपला १ हजार कोटी रुपयांचा हिस्सा तातडीने मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली. यामुळे आई तुळजाभवानीचे पवित्र तीर्थक्षेत्र रेल्वे नकाशावर येईल.
२. लातूर-पुणे इंटरसिटी गाडी तातडीने सुरू करा
लातूर, धाराशिव आणि बार्शी परिसरातील हजारो विद्यार्थी व नोकरदार दररोज पुण्याकडे प्रवास करतात. सध्याच्या गाड्यांची अपुरी संख्या लक्षात घेता लातूर ते पुणे इंटरसिटी गाडी तातडीने सुरू करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली.
३. हरंगूळ-पुणे गाडी पुणे मुख्य स्थानकापर्यंत चालवा
सध्या हरंगूळ ते पुणे गाडी हडपसरपर्यंतच धावते, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. ही गाडी पूर्वीप्रमाणे पुणे मुख्य स्थानकापर्यंत चालवावी, अशी मागणी करण्यात आली.
४. रेल्वे थांबे व नवीन मार्गांचे सर्वेक्षण
* कळंब रोड स्थानकावर लातूर-मुंबई गाडीला थांबा देण्यात यावा
* ढोकी स्थानकावर नांदेड-पनवेल गाडीला थांबा द्यावा
* धाराशिव ते छत्रपती संभाजीनगर या नवीन मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मंजूर निधीबद्दल समाधान व्यक्त करत हे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली
५. पुणे-सिकंदराबाद जलद गती मार्ग धाराशिव-लातूरमार्गे न्यावा
पुणे ते सिकंदराबाद या प्रस्तावित जलद गती मार्गाचा समावेश धाराशिव व लातूरमार्गे करण्यात यावा, जेणेकरून मराठवाड्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली
६. धाराशिव–छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाबाबत विशेष मागणी
छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचे प्रमुख विभागीय व न्यायिक केंद्र असून येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ, अजिंठा-वेरूळसारखी जागतिक वारसा स्थळे तसेच Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University असल्यामुळे मराठवाड्यातील नागरिक, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील लोकांची येथे सतत ये-जा सुरू असते
धाराशिव ते छत्रपती संभाजीनगर हा थेट रेल्वे मार्ग निर्माण करणे अत्यंत आवश्यक असून यामुळे मराठवाड्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होईल, असे खासदारांनी ठामपणे मांडले. या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारकडून ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त करत रेल्वे मंत्रालयाचे आभार मानण्यात आले. मात्र हे सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला गती द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली . या मार्गामुळे धाराशिव व परिसरातील नागरिकांना छत्रपती संभाजीनगर येथे प्रवास करणे अधिक जलद, सुरक्षित व सोयीस्कर होणार असून विद्यार्थी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे

No comments:
Post a Comment