२० मार्चच्या आत होणार जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील १२ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समितीचे सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम २० मार्च २०२६ च्या आत घेण्याच्या सुचना ग्रामविकास विभागाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक पार पडली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती यांची निवड करण्यासाठी जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या बैठका घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम ११(१) आणि कलम ५९ (१) मधील तरतुदीनुसार सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा पहिल्या बैठकीपासून सुरु होतो.
जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार, जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्यांची पहिली बैठक २० मार्च, २०२६ पूर्वी आयोजित करावी असे ग्रामविकास विभागाने पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर व परभणी या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्राव्दारे कळविले आहे.
.jpg)
0 Comments