कार्यकर्ते जो निर्णय देतील, तशीच भूमिका घेणार- आ. डॉ. बाबासाहेब देशमुख
सांगोला (कटूसत्य वृत्त):- शेतकरी कामगार पक्ष हा कोणत्याही एका कुटुंबाचा नसून तो शेतकरी व कष्टकरी जनतेचा आहे. येणाऱ्या निवडणुकांबाबत कार्यकर्ते जो निर्णय देतील, तोच निर्णय स्वीकारून त्याप्रमाणे भूमिका घेतली जाईल, असे स्पष्ट आश्वासन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिले.
सांगोला येथील रामकृष्ण व्हिला गार्डन येथे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. आमदार डॉ. देशमुख पुढे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शेकाप आघाडीला शहरात पराभव स्वीकारावा लागला. त्या पराभवाची नैतिक जबाबदारी मी स्वतः स्वीकारतो. यापुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते ज्या दिशेने निर्णय देतील, त्या दिशेने आघाडी अथवा स्वतंत्र निर्णय घेतला जाईल. स्व. आबासाहेबांच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव असून तो विचार मी कधीही तडा जाऊ देणार नाही.
हिवाळी अधिवेशनात सांगोला शहर व तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवला आहे. यामध्ये शहरातील नागरी प्रश्नांसह चारा छावणीच्या प्रलंबित अनुदानाचा मुद्दा मांडण्यात आला असून तो मार्गी लागण्याच्या प्रक्रियेत आहे. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात आली आहे. तसेच सकाळ-संध्याकाळचे लोडशेडिंग बंद करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
टेंभू-म्हैसाळ योजनेतून वंचित राहिलेल्या क्षेत्रांचा समावेश करून टेंभू योजनेसाठी ७० कोटी रुपयांची तरतूद मंजूर करून घेतली आहे. माण व कोरडा नदीवर बंधारे भरुन देण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मका उत्पादन होत असून येत्या एक-दोन दिवसांत मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.
या मेळाव्यासाठी तालुका चिटणीस दादासाहेब बाबर, सांगोला तालुका बाजार समितीचे अध्यक्ष समाधान पाटील, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रमेश जाधव, नंदकुमार शिंदे, आबासाहेब बंडगर, शिवाजी शेजाळ, नवनाथ शिंगाडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी डॉ. निकीता देशमुख, शिवाजी व्हनमाने, विनायक कुलकर्णी, गजेंद्र कोळेकर, कल्पना शिंगाडे, संगम धांडोरे, नंदकुमार शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यात विविध वस्तूंचे लकी ड्रॉची सोडत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते काढण्यात आले.
वैयक्तिक टीका कधीही खपवून घेणार नाही - आमदार देशमुख
"हमें पसंद है शांत रहना,
इसे हमारी कमजोरी मत समझना…"
असा शेर सांगत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर व माझ्या कुटुंबीयांवर खालच्या पातळीवर टीका-टिप्पणी केली जात आहे. राजकीय टीका स्वीकार्य आहे; मात्र वैयक्तिक व कुटुंबावर होणारी टीका मी कधीही सहन करणार नाही. विरोधकांचा राजकीय डाव मला समजतो. यापुढे माझ्या कुटुंबीयांचा व शेकापच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय अथवा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

0 Comments