राज्यात रस्ता अपघातांतील मृत्यूदरात घट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 24, 2025

राज्यात रस्ता अपघातांतील मृत्यूदरात घट

 राज्यात रस्ता अपघातांतील मृत्यूदरात घट


मुंबई (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्यूदरात घट नोंदविण्यात आली आहे.

जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यात एकूण ३३,००२ अपघात झाले असून, त्यामध्ये १४,०६६ अपघाती मृत्यू झाले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत ३२,७८४ अपघातांत १४,१८५ मृत्यू झाले होते. तुलनात्मक पाहता, अपघातांची संख्या २१८ ने (०.६६ टक्के) वाढली असली तरी अपघाती मृत्यूंची संख्या ११९ ने म्हणजेच ०.८३ टक्क्यांनी घटली आहे. मृत्युदरातील ही घट रस्ता सुरक्षा उपाययोजनांचे यश दाखवते.

दरम्यान, मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरही अपघाती मृत्यूंमध्ये मोठी घट नोंदविण्यात आली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत या मार्गावर ८२ अपघाती मृत्यू झाले होते, तर २०२५ मध्ये ही संख्या ६१ वर आली आहे. म्हणजेच २१ मृत्यूंनी (२६ टक्के) घट झाली आहे. तसेच अपघातांची संख्या ६६ वरून ५४ इतकी कमी झाली असून, त्यामध्ये १८ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.

रस्ता सुरक्षा उपायांमुळे काही जिल्ह्यांमध्ये मृत्यूंच्या संख्येत विशेष घट दिसून आली आहे. नागपूर शहरात २१ टक्के, पालघरमध्ये २० टक्के, अमरावतीत १७ टक्के, पुण्यात १५ टक्के, धुळ्यात १४ टक्के तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १२ टक्क्यांनी अपघाती मृत्यू कमी झाले आहेत, असे परिवहन विभागाने कळविले आहे.

राज्यातील रस्ता अपघातांची संख्या सन २०३० पर्यंत ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट परिवहन विभागाने निश्चित केले असून, त्यासाठी भविष्यात रस्ता सुरक्षा उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. याचबरोबर, राज्यातील सर्व वाहनचालक व पादचारी नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहनही परिवहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages