नवी दिल्ली (वृत्त सेवा):- देशातील शेतकरी आज गंभीर आर्थिक संकटात सापडलेला असताना, त्यांच्या हक्कांसाठी निर्णायक पावले उचलण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज लोकसभेत पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ आणि संपूर्णपणे अंमलात आणण्याची ठाम मागणी केली.
खासदार निंबाळकर म्हणाले की, उत्पादन खर्चावर किमान ५० टक्के नफा देणारी हमीभाव (MSP) व्यवस्था शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरेल. वाढती महागाई, खत-बियाण्यांचे दर, मजुरी खर्च आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी अक्षरशः अडचणीत सापडला असून, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी ही काळाची गरज आहे.
ते पुढे म्हणाले की, सरकारकडून केवळ घोषणा न करता ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. शेती टिकवायची असेल तर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित योग्य दर, कर्जमाफी, सिंचन सुविधा आणि बाजारपेठेतील संरक्षण मिळाले पाहिजे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्र सरकारला स्पष्ट शब्दांत सांगितले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर सामाजिक आणि आर्थिक परिणाम देशाला भोगावे लागतील. त्यामुळे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

0 Comments