संतसाहित्य शिक्षणपद्धतीत येणे गरजेचे - डॉ. विजय लाड
मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे राज्यस्तरीय संत साहित्य पुरस्कार वितरण संपन्न
पिंपरी, पुणे (कटूसत्य वृत्त):- भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव २०४७ मध्ये साजरा होणार आहे. तोपर्यंत भारत देशाची विश्ववंदित राष्ट्र अशी प्रतिमा उभारली पाहिजे. त्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व शिक्षण पद्धतीत संतसाहित्याचा समावेश करणे गरजेचे आहे, असे विचार शिवथर घळ येथील श्री सुंदर मठ सेवा समितीचे विश्वस्त डॉ. विजय लाड यांनी शनिवारी (दि २२) रोजी व्यक्त केले.
निगडी प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनी मधील मनोहर सभागृह मातृमंदिर विश्वस्त संस्था आयोजित संत साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष नितीन भाई कारिआ, कार्यवाह डॉ. मनोज देवळेकर, उपाध्यक्षा शारदा चोरडिया, उपक्रम संयोजक सुधीर कुलकर्णी, सुभाष देशपांडे उपस्थित होते.
डॉ. विजय लाड म्हणाले, 'संतांनी मानवी जीवनातील सूक्ष्म व्यवहाराचा साक्षेपाने विचार केला आहे. 'ज्ञानेश्वरी' आणि 'दासबोधा'त विज्ञानाचे अनेक दाखले आढळतात. संपन्नता असावी, पण किती असावी याबाबत संतांनी सांगितले आहे. संत विभूती आहेत. संतांची शिकवण तळागाळात पोहोचवायला हवेत. संतांचे समाजात विचार रुजवायला हवे. तरुणांनी संत साहित्य वाचले पाहिजे.''
सुधीर कुलकर्णी म्हणाले, गेल्या २७ वर्षापासून राज्यभरात संत साहित्य पुरस्कार वितरण केले जाते. त्यास प्रतिसाद मिळत आहे. लेखक आणि प्रकाशक या दोघांना प्रथमच पुरस्कार दिला जात आहे. यातून संत साहित्याचा प्रसार आणि लेखन अधिक व्हावे हा उद्देश आहे.'
"बोलावा विठ्ठल... " या भक्तिगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ आणि "रत्नाकरा..." या प्रार्थनेने समारोप करण्यात आला. यावेळी पुरस्कार वितरण करण्यात आले. समीक्षक राधा गोडबोले आणि डॉ. रजनीताई पत्की यांचा सन्मान केला.
सूत्रसंचालन अभिलेखा शिंदे आणि सुभाष देशपांडे यांनी आभार मानले.
या ग्रंथ आणि लेखकांचा केला सन्मान
चिंतनपर आणि विवेचनपर पुस्तकांच्या गटामध्ये डॉ कल्पना काशीद, डॉ विश्वास मोरे, यांच्या 'पाऊले तुकोबांची' ग्रंथ (प्रथम), रोहन उपळेकर यांच्या 'विदारूनी महास्तंभ देव प्रकट स्वयंम' या ग्रंथास (द्वितीय) डॉ. के. वा आपटे यांच्या 'आद्य शंकराचार्य कृत सर्व वेदांत सिद्धांत सार संग्रह' या आणि डॉ. नारायण रघुनाथ देशपांडे यांच्या पूर्णकळा' ग्रंथास तृतीय क्रमांक प्रदान केला. विशेष पुरस्कार डॉ. श्यामा घोणसे यांच्या 'क्रांतदर्शी महात्मा बसवेश्वर' या ग्रंथ तसेच विश्वनाथ छत्रे यांच्या 'श्री गणेशोत्सव गीतसार' या ग्रंथास विभागून बक्षीस दिले. संत जीवन आणि ललित साहित्य गटात डॉ. के. वा. आपटे यांच्या 'षष्ठ पंचशीका' या ग्रंथास (प्रथम), डॉ सुनिती सहस्रबुद्धे यांच्या 'सार्थ श्रीराम गीता' या ग्रंथास (द्वितीय) क्रमांक प्रदान केला.
फोटो ओळ :- १) ज्ञानप्रबोधिनी मधील मनोहर सभागृह मातृमंदिर विश्वस्त संस्था आयोजित संत साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात पाऊले तुकोबांची ग्रंथास प्रथम पुरस्कार दिला. २) संत साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ललित साहित्य या गटामध्ये डॉ. के. वा. आपटे यांच्या 'षष्ठ पंचशीका' या ग्रंथास प्रथम क्रमांक प्रदान केला. ३) सुनीती सहस्त्रबुध्ये
.jpg)
.jpg)
0 Comments