नवे नेते पुढे आले ठीक, मग जुने अनुभवी नेते गेले कुठे ? प्रत्येक जि.प. गटातील स्थिती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 17, 2025

नवे नेते पुढे आले ठीक, मग जुने अनुभवी नेते गेले कुठे ? प्रत्येक जि.प. गटातील स्थिती

 नवे नेते पुढे आले ठीक, मग जुने अनुभवी नेते गेले कुठे ?

 प्रत्येक जि.प. गटातील स्थिती

मोहोळ तालुक्यातील अनेक जि.प .गटात 
हिवाळ्याच्या तोंडावर वातावरण तापले
निवडून आणणाऱ्यांपेक्षा पडद्याआडचे पाडणारेच जास्त चर्चेत



मोहोळ (साहिल शेख):- येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मोहोळ तालुक्यातील राजकारणामध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या गणितांचा कुठेतरी मेळ घातला जात असल्याचे अधून मधून जाणवते. मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक ही वास्तविक पाहता एकूण तीन गटात लढणे अपेक्षित आहे. एक म्हणजे राष्ट्रवादीचा गेल्या अनेक वर्षापासूनचा सत्ताधारी असणारा गट दुसरा म्हणजे राष्ट्रवादीला विरोध म्हणून नव्याने विधानसभेला सत्तेवर आलेला दुसरा गट आणि तिसरा म्हणजे या दोन्ही गटांना वैतागलेला समांतर गट. भीमा कारखान्याची सूत्रे हातात घेतलेल्या आणि नंतर खासदार झालेल्या धनंजय तथा मुन्ना महाडिक यांनी त्यावेळी अनगरकर पाटील राष्ट्रवादीला धक्का देत टाकळी सिकंदर गट ताब्यात घेत भीमा परिवाराचा या भागातील वरचष्मा कायम ठेवला. या जि.प गटाच्या पुनर्बांधणीनंतर या जिप गटाचे नाव पेनुर जिल्हा परिषद गट असे नव्याने झाले. तर मोहोळ नगरपरिषद आणि अनगर नगरपंचायत स्थापन झाल्यामुळे सहाजिकच अनगर आणि मोहोळ हे दोन जिल्हा परिषद गट संपुष्टात येऊन पोखरापूर जिल्हा परिषद गट हा नवा गट स्थापन झाला.
लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी अनगर जिल्हा परिषद गटातून विक्रमी मताधिक्याने निवडून येत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पदाबरोबर शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती पद देखील भूषवले.त्यानंतरच्या निवडणुकीत आष्टी जिल्हा परिषद गटातून विजयी झालेले विजयराज डोंगरे यांनी अर्थ व बांधकाम समितीचे सभापतीपद भूषवत त्यांच्या मर्जीतल्या जि. प. गटातील आणि पंचायत समिती गणातील पदाधिकाऱ्यांना जीपस्तरावरून निधी देत बेरजेचे राजकारण सुरू ठेवले.आता नव्याने झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीन जिल्हा परिषद गट हे सर्वसाधारण खुले तर झालेच मात्र एक गट सर्वसाधारण महिला होऊन एक गट ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाला. ज्या त्या भागात सवता सुभा निर्माण केलेल्या अनेक नेत्यांना ही निवडणूक लढविण्यासाठी आता आजूबाजूचे मतदारसंघ शोधावे लागणार नाहीत. 

अहो नरखेडच नक्की ठरलंय तरी काय ?
गेल्या पाच वर्षात सातत्याने गटबाजीचे आणि टीकाटिपणीचे राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेल्या नरखेड जि. प. गटातील आरक्षण सर्वसाधारण खुले झाल्यामुळे या प्रभागातून विद्यमान जि.प .सदस्य असलेले आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले उमेश पाटील यांच्या विरोधात अनगरकर -पाटील राजकीय गटप्रवाहा कडून कोणत्या उमेदवारीची घोषणा होणार ? अनगरकरापासून चार हात दूर गेलेले बाजार समितीचे माजी सभापती नागेश साठे हे निवडणूक लढवणार की अन्य कोणती भूमिका घेणार ? त्याचबरोबर दिवंगत नेते आणि जी.प.चे शिक्षण व आरोग्याचे माजी सभापती सुशांत कादे यांच्या सुविद्य पत्नी शितल कादे, राष्ट्रवादीच्या महिला कार्याध्यक्ष ज्योत्स्नाताई पाटील, तसेच या भागातील राष्ट्रवादीचे पडद्यामागचे संघटक अनिल कादे यांच्या विचार प्रवाहातील एखाद्या उमेदवाराचाही समावेश या यादीत होऊ शकतो.

पेनुर मधील हाय व्होल्टेज लढत नक्की किती जणात ?
पेनुर मध्ये शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख चरण राज चौरे राष्ट्रवादीचे रामदास चवरे, माजी उपसभापती मानाजी माने, प्रगतशील बागायतदार शिरीष गवळी, पाटकुलचे सुपुत्र प्रभाकर भैय्या देशमुख, कोथाळेचे काँग्रेसचे नेते राजेश पवार यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत आहेत. भाजपाचे तालुका अध्यक्ष असलेल्या रमेश चवरे, लोकनेते संचालक आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांचे हे गाव आहे, तर बाळराजे पाटील यांचे निकटवर्तीय समर्थक असलेले सागर मास्तर चवरे हे देखील याच जि.प. गटात युवा नेते म्हणून कार्यरत आहेत. शिवाय गावातील ज्येष्ठ नेते प्रकाश कस्तुरे सर्जेराव दाजी चवरे यांच्या ही भूमिका या जि.प. गटातील राजकीय घडामोडी मध्ये निर्णायक ठरणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages