शेतकऱ्यांचे गुन्हेगारीकरण थांबवा; शरद काकडे प्रकरणावरून प्रशासनावर अॅड. असिम सरोदे यांचा संताप
जालना (कटूसत्य वृत्त) :- शेतकरी बांधव शरद काकडे याच्याकडे फक्त पाण्याची बाटली होती, हे तो ओरडून ओरडून सांगत होता. मात्र पोलिसांच्या मदतीने असे पसरविण्यात आले की तो ज्वलनशील पदार्थ घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करीत होता. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांचे गुन्हेगारीकरण असून त्याचा तीव्र निषेध आहे, अशी भूमिका अॅड. असिम सरोदे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमधून व्यक्त केली आहे.
सरकारच्या सांगण्यानुसार वागणारे जिल्हाधिकारी आणि पोलिस यांच्यावर त्यांनी थेट टीका केली. "शेतकऱ्यांच्या आंदोलनाला गुन्हेगारी वळण लावून त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी विसरू नये की तेही अनेकजण शेतकरी कुटुंबातूनच आलेले आहेत," असे अॅड. सरोदे यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय देण्याऐवजी त्यांना खलनायक ठरवण्याची ही नीती त्वरित थांबवावी, अन्यथा शेतकऱ्यांमध्ये अधिक रोष निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
0 Comments