अतिवृष्टीग्रस्तांना केंद्र शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी
अकलूज (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रात सध्या झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील शेती, पिके आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच शहरी भागातही या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षा खा.सुप्रिया सुळे यांच्या समवेत खा.धैर्यशील मोहिते पाटील, खा. बजरंग सोनावणे खा. बाळ्यामामा म्हात्रे यांनी भेट घेतली.
या भेटीदरम्यान अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना केंद्र शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस बांधवांवर गुंड प्रवृत्तींकडून होणाऱ्या वारंवारच्या हल्ल्यांवर चिंता व्यक्त करत, या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणीही या शिष्टमंडळाने केली.
यावेळेस खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी सहकार क्षेत्रात दीर्घकालीन आणि उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यासाठी, सहकार मंत्रालयामार्फत विशेष केंद्रीय पुरस्कार सुरू करण्याची महत्त्वपूर्ण मागणी केंद्रीय सहकार तथा गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली.

0 Comments