सोलापूरात मुसळधार पावसामुळे शेतात पाणीच-पाणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 15, 2025

सोलापूरात मुसळधार पावसामुळे शेतात पाणीच-पाणी

 सोलापूरात मुसळधार पावसामुळे शेतात पाणीच-पाणी





शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; शहरापासून गावांचा संपर्क तुटला

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुरात आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याच्या अनेक भागात धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगा गावासह अनेक भागात पुलावर सर्वत्र पाणी आले आहे.

अनेक गावांचा सोलापूर शहराशी असलेला संपर्क तुटलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परिश्रमानं जोपासलेल्या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे गावचे सरपंच मनोज महाडिक यांनी शासनाकडे केली आहे.


नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागले

मागील चार दिवसात दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने सर्वत्र झोडपून काढलं आहे. या पावसामुळे नद्या - नाले तुडुंब भरून वाहत आहेत. रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे अनेक गावात नदी आणि ओढ्यांना पूर सदृश्य परिस्थिती आली आहे. नदी - ओढ्यांवर आलेल्या पुरामुळे बक्षी हिप्परगे ते सोलापूर जिल्ह्यातील वरळेगांव, वडजी आणि मराठवाड्यातील सीमावर्ती भागातील खडकी धोत्री या मार्गाची वाहतूक खंडित झाली आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे गावाचा सोलापूर शहराशी असलेला संपर्कही खंडित झाला आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात सर्वत्र पाणी साचलं असून त्यामुळे खरिपातील तूर, उडीद, सोयाबीन, मुग यासह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
राष्ट्रीय महामार्गवर संथगतीने वाहतूक सुरू

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी, बक्षी हिप्परगे, बोरामणी या भागात गेली दोन सतत पाऊस झाला. या भागातील पावसामुळे शेळगी नाल्यातून बुधवारी सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर आले. या पाण्यातून मार्ग काढत वाहनांची धीम्या गतीने ये-जा सुरू होती. शेळगी नाला ओसंडून वाहत आहे. या नाल्याचे पाणी हैदराबाद रोड, शेळगी येथील वसाहतींमध्ये शिरले. राष्ट्रीय महामार्गावर आले. रूपाभवानी स्मशानभूमी परिसरातील रस्त्यावर बुधवारी दुपारी गुडघाभर पाणी होते. या पाण्यातून मार्ग काढीत वाहतूक सुरू होती. वडजी, बक्षी हिप्परगे, बोरामणी या भागातील सात ठिकाणचे पाणी नाल्यात येत आहे. पाणी वाढत राहिले तर हा रस्त्यावरील वाहतूक काही तास बंद ठेवावी लागणार आहे.
शहराजवळील तलाव तुडुंब भरले

पावसामुळे शहराला लागून असलेलं हीप्परगा तलाव तुडुंब भरून वाहत आहे. या तलावाच्या सांडव्यातून आदिला नदी आणि नाल्यामध्ये आलेले पाणी बुधवारी सकाळी मडकी वस्ती गणेश नगर, यश नगर, बनशेट्टी नगर, अभिमान श्री नगर, आर्यनंदी नगर या नगरांमध्ये शिरलं. वसंत विहार येथील नाला भरुन वाहत आहे. तलावातून विसर्ग वाढल्यास नाल्यावरचा रस्ता बंद होण्याची भीती आहे.

नाला वळविल्याने घरात पाणी

आदीला नदी आणि शेळगीचा जुना नाला हे अवंतीनगर येथील जुन्या बाराकमानी जवळील ब्रिटिशकालीन रेल्वे ब्रिजच्या ठिकाणी क्रॉस होतात. परंतु त्या ठिकाणी शेळगी नाला वळवून तो आदीला नदीला जोडण्यात आला आहे. नैसर्गिक नाल्यात मानवी हस्तक्षेप वाढला. ब्रिजच्या दुसऱ्या बाजूचा नैसर्गिक नाला बुजवून तिथे घरे वसविली. त्यामुळे पाण्याचा वेग मंदाविण्याबरोबर त्याची क्षमता कमी झाली. पावसामुळे पाणी वाढल्याने त्याचा फटका या परसिरातील लोकवसाहतीला बसत आहे. नाल्याच्या मार्गात घरे वसल्यामुळे हिप्परगा तलावातील पाणी वाढले की, नाल्यातील पाणी वाढते. जुना पुना नाका, वसंत विहार, अवंतीनगर गणेशनगर या भागाला पाण्याचा विळखा पडतो.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages