Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस; १६ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

 राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस; १६ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट




मुंबई (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, हवामान विभागाने १२ ऑगस्ट रोजी राज्यातील १६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. दक्षिण-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा गडगडाटासह पाऊस पडू शकतो. मुंबईत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस इतके राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे, तर पालघरमध्येही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

पुण्यात आज साधारणतः ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि बीड या चार जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर जिल्ह्यांमध्ये साधारणतः ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.

विदर्भातील यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांना गरज असल्याशिवाय बाहेर पडू नये आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments