आठ दिवसांत ऊसबिले न दिल्यास सळो की पळो करू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 23, 2025

आठ दिवसांत ऊसबिले न दिल्यास सळो की पळो करू

 आठ दिवसांत ऊसबिले न दिल्यास सळो की पळो करू




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- परिसरातील साखर कारखान्यांनी येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊसबिले जमा न केल्यास कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडू, प्रसंगी अध्यक्षांच्या गाड्या फोडू, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी सोमवारी (ता.२१) दिला.

थकीत ऊसबिले प्रश्‍नी रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर साखर कारखान्यावर मोर्चा काढला. याप्रसंगी ते बोलत होते.

भोसले म्हणाले, पंढरपूर, माढा परिसरातील कारखान्यांनी मागील हंगामातील उसापोटी शेतकऱ्यांनी पहिली उचल म्हणून प्रतिटन दोन हजार ८०० रुपये दिले आहेत. मात्र, सोलापूर भागातील कारखान्यांनी प्रतिटन एक हजार ५०० रुपये दिले आहेत, हे दुर्दैव आहे. या कारखान्यांनी येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊसबिले जमा न केल्यास त्यांना सळो की पळो करून सोडू. तसेच वेळप्रसंगी अध्यक्षांच्या गाड्या फोडू.

सिद्धेश्वर कारखान्याच्या अध्यक्षांनी मागे दिलेल्या आश्वासनाची भोसले यांनी आठवण करून दिली. २०२२ - २३ या गाळप हंगामात १० लाख टन उसाचे गाळप झाल्यास प्रतिटन २५ रुपये जादा तर २०२३ - २४ गाळप हंगामात प्रतिटन ३०० रुपये जादा दर देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु कारखान्याने त्यापोटी अद्याप एक रुपयाही दिलेला नाही.

२०२४-२५ च्या गाळप हंगामात ऊस गाळप होऊन सात-आठ महिने होऊनही शेतकऱ्यांना एक रुपया मिळालेला नाही. वाढत्या अडचणींमुळे शेतकऱ्यांनी बिल मागितल्यावर प्रत्येकाला उचल म्हणून प्रतिटन १५०० रुपये दिले आहेत. मागील हंगामातील २३ - २४ कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे आहे. सहा महिन्यांपासून कामगारांना वेतन नाही. कारखान्याकडे साखर शिल्लक नाही. मोलॅसिसही उरले नाही.

मग कारखाना शेतकऱ्यांचे पैसे कसे देणार, असा सवालही त्यांनी केला. हा मोर्चा सिद्धेश्वर कारखान्याच्या मेन गेटमधून आतील गेटवर नेण्यात आला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. याप्रसंगी रयत क्रांती संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष अमोल वेदपाठक, जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, रयत क्रांती पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब बोबडे, हनुमंत गिरी, बाबा ननवरे, रूपेश वाघ, किरण पाटील, दिनेश शिंदे, धनाजी रूपनर, तनुजा काळे यांच्यासह शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages