वारकर्यांना सावली देणारे "हरित वारी" उपक्रमास सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा अभूतपूर्व प्रतिसाद
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब वारकर्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पंढरीचा पांडुरंग. या पांडुरंगाच्या भेटीसाठी प्रत्येक महिन्याच्या एकादशीला पंढरीची वारी करणारा वारकरी संप्रदाय आजही महाराष्ट्रात आहे. त्याच प्रमाणे *आषाढी वारी* साठी तर राज्यातून वारकरी पायी चालत पंढरीची वारी करण्यासाठी पंढरपुरला येतात. या पायी चालत येणार्या संतांच्या पालख्या या आषाढी वारीच्या कालावधीत चारही बाजूने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतात. वारकर्यांच्या वारी मार्गावर केंद्र शासन तसेच राज्य शासन यांच्या माध्यमातून मोठ मोठे रस्ते- महामार्ग तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे वारकर्यांची पायी वारी चा मार्ग सुकर झाला आहे.
परंतु या रस्त्यावरून जात असताना पायी चालणार्या वारकऱ्यांना सावलीची गरज होती. ही गरज ओळखून सोलापूर ग्रामीण दलाचे वृक्षप्रेमी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वारकर्यांच्या पायी चालणार्या मार्गावर सावली देणारी झाडे लावण्याचा निश्चय केला. पालखी मार्गावरील पोलीस ठाणे, ग्रामपंचायत, नागरिक, संघटना व संस्था यांना झाडे लावण्याबाबत आवाहन केले. त्यास जिल्ह्यातील पोलीस ठाणे व नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
जिल्ह्यात येणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संत सोपानकाका, संत जनाबाई, श्री गजानन महाराज व इतर लहान सहान दिंडीचे मार्गावर सावली देणारे चिंच, करंज, पिंपळ, वड, लिंब, अशा झाडांची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नातेपुते, अकलूज, माळशिरस, वेळापूर, पंढरपूर, करकंब मोहोळ, टेंभुर्णी मंगळवेढा, कामती व सोलापूर तालुका या पोलीस ठाणे हद्दीत प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील पालखी मार्गावर सुमारे 1,00,000 झाडांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांची पुढील वाढ व त्यांचे संरक्षण करण्यासाठी देखील मा. पोलीस अधीक्षक यांनी योजना आखली आहे. या झाडांना पाणी, संरक्षण जाळी बनवून त्यांची वाढ होईपर्यंत लक्ष देण्यात येणार आहे.
0 Comments