आम्ही निवडणुकीत पडलो, पण संपलो नाही- इम्तियाज जलिल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एमआयएम पराभूत झाली परंतु संपली नाही. आजही जनतेच्या मनात एमआयएम बद्दल प्रेम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, अच्छे दिन येणार आहेत.
त्यांना अच्छे दिन आले की नाही, माहिती नाही परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एमआयएमला अच्छे दिन नक्कीच येतील, असा विश्वास माजी खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल यांनी व्यक्त केला.
सोलापुरच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी नई जिंदगी येथील सहारा मल्टिपर्पज हॉल येथे कार्यकर्त्यांशी मेळाव्यातून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष तथा शहराध्यक्ष फारुक शाब्दी, अन्वर सादात, शौकत पठाण आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष जलील म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एमआयएम पूर्ण ताकदीने उतरणार आहे. एमआयएमला हरविण्यासाठी काहीही केले जाईल, कोणाचीही कोणासोबत युती किंवा आघाडी होईल. पैशांचा प्रचंड वापर केला जाईल. कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत सजग रहावे, असे आवाहन केले.
प्रदेश कार्याध्यक्ष शाब्दी म्हणाले, मी विधानसभा निवडणुकीची जेवढ्या अतुरतेने वाट पहात नव्हतो, तेवढ्या अतुरतेने महापालिका निवडणुकीची वाट पहात आहे. एमआयएमवर आणि खासदार असदोद्दिन ओवेसी यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. सोलापूरच्या इतिहास यंदाच्या महापालिका निवडणुकीत एमआयएम अधिक दमदार कामगिरी करेल.
मला पाडले, आता तुमच्या मागे लागणार
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी सर्वजण एकवटले. मी २४ वर्षे पत्रकार म्हणून काम केले आहे, त्यानंतर मी आमदार व खासदार झालो. मी आता माझ्या मूळ पदावर आलो आहे. तुम्ही मला पाडले, मी तुमच्या मागे लागलो आहे, असे सांगत मंत्री संजय सिरसाट यांची आपण झोप उडविली आहे. त्यांनी केलेला गैरव्यवहार बाहेर काढला असल्याचेही प्रदेशाध्यक्ष जलील यांनी सांगितले.
0 Comments