जूनच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात १७ टक्के क्षेत्रावर पेरण्या
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाने मे महिन्यातच हजेरी लावल्याने कधी नव्हे ते जिल्ह्यात खरीप पेरण्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यातच सुरुवात झाली आहे. यंदा आतापर्यंत ५७ हजार ४७४ हेक्टरवर (१७.०१ टक्के) पेरणी झाली आहे.
यामध्ये बार्शी, करमाळा आणि सांगोल्यामध्ये सर्वाधिक पेरणी झाली आहे.
गेल्या काही दिवसांत जिल्ह्याच्या काही भागांत पाऊस, काही भागात उघडीप असे वातावरण आहे. पण आतापर्यंतच्या पावसाचा विचार करता, जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला आहे. आता चांगला वाफसा मिळाल्याने शेतकऱ्यांनी पूर्वमशागतीसह खरीप पेरण्यांना सुरुवात केली आहे. पूर्वमोसमी पावसाने लावलेली दमदार हजेरी व येत्या काळातही चांगला पाऊस पडण्याचा अंदाज यामुळे यंदा खरिपाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ५४५ मिमी आहे. आतापर्यंत त्यापैकी २३२.२ मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्याचे खरिपाचे सरासरी क्षेत्र ३ लाख ३७ हजार ९६८ हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत ५७ हजार ४७४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
२२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
मे महिन्यात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात उन्हाळी पिकांसह फळबागांचे आतापर्यंत ३२ हजार ४४० शेतकऱ्यांचे २१ हजार ९८९ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. सध्या या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरू आहे. त्यानंतर आणखी नेमका आकडा पुढे येणार आहे. त्याशिवाय मदतीचेही धोरण ठरले जाणार आहे, असे सांगण्यात आले.
0 Comments