Hot Posts

6/recent/ticker-posts

पाण्यासाठी अक्कलकोटच्या नागरिकांचा टाहो

 पाण्यासाठी अक्कलकोटच्या नागरिकांचा टाहो



अक्कलकोट (कटुसत्य वृत्त):- कुरनूर धरणात सध्या ५० टक्के पाणीसाठा असूनही अक्कलकोट शहर व तालुक्याचा पाणीप्रश्न अद्यापही सुटलेला नाही. शहरातील नागरिकांना दर १० ते ११ दिवसांनी पाणी मिळत असून, काही उपनगरांत तर ही स्थिती अधिक गंभीर आहे. समर्थ नगरसारख्या भागात तब्बल २१

दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे धरणात पाणी असूनही नळ कोरडे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.


कुरनूर धरण हे शहर व  परिसरासाठी प्रमुख जलस्रोत  आहे. यंदाच्या उन्हाळ्यात  अपेक्षेपेक्षा चांगला पाऊस  झाल्यामुळे धरणात ५० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मात्र या साठ्याचा शहरातील नागरिकांना लाभ मिळताना दिसत नाही. जलसंपत्ती असतानाही शहराचा मोठा भाग दुष्काळग्रस्तासारखा भासत आहे.


शहरात आणि उपनगरांत पाणीपुरवठा करताना नियोजनाचा अभाव स्पष्ट दिसून येतो. जुनाट पाइपलाइन, वेळेवर दुरुस्ती न होणे, पाणी वाया जाणे, बेकायदेशीर नळजोडणी अशा अनेक अडचणी

यामागे कारणीभूत ठरत आहेत. त्यातच स्थानिक प्रशासनाकडून स्पष्ट आराखडा देण्यात येत नाही.  त्यामुळे नागरिकांचा संयम सुटू लागला आहे.


समर्थनगर भागात तब्बल २१ दिवसाआड पाणी येते. त्यामुळे नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागते. अनेक वेळा खासगी टँकर चालकांनी दर वाढवले असून सामान्य माणसासाठी हे परवडणारे राहिलेले नाही यामुळे घरचा अतिरिक्त खर्च वाढला आहे.


प्रशासनाकडून वेळोवेळी 'लवकरच नियमित पाणीपुरवठा सुरू करू' अशी आश्वासने दिली जातात. मात्र प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. अनेक वेळा नगरपरिषद आणि पाणीपुरवठा विभाग यांच्यातील समन्वयाचा अभाव देखील अडथळा ठरत आहे.


कुरनूर धरणात अर्धा जलसाठा असतानाही अक्कलकोट शहर पाण्यासाठी तडफडत आहे, ही अत्यंत दुर्देवी बाब आहे. यामागे केवळ निसर्ग नाही तर यंत्रणांची उदासीनताही तितकीच जबाबदार आहे. पाणी हा मूलभूत हक्क आहे आणि तो वेळेवर मिळावा, ही नागरिकांची अपेक्षा आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments