शेतकरी कसाबपेक्षा वाईट आहे का? राजू शेट्टी
वैराग (कटूसत्य वृत्त):- दहशतवादी अजमल कसाबला आपले म्हणणे मांडण्याचा हक्क असेल तर ज्या शेतकऱ्यांची स्वतःची जमीन आहे त्यांनी हरकती घेतलेल्या असताना सुद्धा आपले म्हणणे मांडताना सरकार विचार करीत नाही, इथला शेतकरी कसाबपेक्षा वाईट आहे का? जरकसाबसाठी सरकारचा मानवतावादी दृष्टिकोन असेल तर शेतकऱ्यांसाठी का नाही? असा संतप्त सवाल शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला केला आहे. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी बार्शी तालुक्यातील आंबेगाव येथे बाधित शेतकरी जमल्यानंतर त्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
बार्शी तालुक्यातून जात असलेल्या शक्तिपीठ महामार्गाची मोजणी आज आंबेगाव येथून करण्यात येणार होती त्याकरिता महसूल प्रशासन आंबेगाव येथे जमले होते. दरम्यान, आंबेगावसह गौडगांव, रुई, जवळगाव, हत्तीज, चिंचखोपन, शेळगांव आर या गावातील बाधित शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हनुमंत जाधव, विजयकुमार पाटील, जवळगावचे सरंपच त्रिंबक कापसे, शेतकरी संघटनेचे हनुमंत कापसे, धाराशिव जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, युवा आघाडीचे आंबेगावचे राजपाल दळवी, हत्तीजचे दादाराव जाधव, धर्मराज जाधव, सुहास गायकवाड, सोमनाथ गायकवाड, भास्कर पाटील आदी शेतकरी आंबेगाव शिवारात मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरमध्ये सर्वप्रथम तीव्र विरोध झाला. यावेळी सत्तेतील दोन मंत्र्यांनी देखील तीव्र विरोध केल्यामुळे सरकारने कोल्हापूर बाहेरून महामार्ग वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. केवळ कोल्हापुरातूनच विरोध होत असल्याचे सरकार दाखवून देत आहे मात्र तसे नसून राज्यातूनच या शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत असून येत्या एक जुलै या कृषी दिनी बाधित सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शेट्टी म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांचे नाही? शेतकऱ्यांचे असते तर हा शक्तिपीठ महामार्ग केला नसता. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांना अधिकचे पैसे स्वतःच्या घशात घालायचे आहेत. शासनाचे मोजणीला आलेले जे ड्रोन कॅमेरे आहेत ते आदी गोफनीने पाडा, म्हणजे सरकारला कळेल
शेतकरी काय करू शकतो. जर पोलीस शेतकऱ्याची अडवणूक करीत असतील तर त्यांना पण धडा शिकवा, असेही शेट्टी यावेळी म्हणाले.
आंबेगाव वाणेवाडी येथील शेतीची मोजणी करण्यासाठी ड्रोन कॅमेरा घेऊन महसूल प्रशासन आले होते. मात्र याला बाधित शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध झाला. मात्र गुरुवार, दि. २६ रोजी पुन्हा बार्शी तालुक्यातील काही शेतकऱ्यांना यासंदर्भात नोटीस बजावण्यात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ३ जुलै रोजी शेळगाव, वाणेवाडी परिसरातील शेत जमिनीची मोजणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी आरसीपी पोलीस पथक १२ जवानांचे प्रमुख एच.सी. कुंभार, निर्भया पथक, तहसीलदार एफ. आर. शेख, वैराग पोलीस निरीक्षक कुंदन गावडे घटनास्थळी उपस्थित होते.
चौकट
बार्शी तालुक्यात ३० कि.मी.चा मार्ग
शक्तिपीठ महामार्गाचे सोलापूर जिल्ह्यातून १५४ किलोमीटर अंतर असून, त्यापैकी बार्शी तालुक्यातून ३० किमी अंतराचा रस्ता जाणार आहे. बार्शी तालुक्यातील सुमारे सात गावातील साडेपाचशे शेतकऱ्यांची ५०० हेक्टर जमीन रस्त्यासाठी जाणार आहे.
चौकट
आधी दर जाहीर करा
अन्यथा मोजणीला विरोध
सांगोला शक्तीपीठ महामार्गासाठी प्रत्यक्षात बाधित शेतकऱ्यांशीच चर्चा करावी. बाधित होणाऱ्या भूसंपादनाचा दर आगोदर ठरवा अन्यथा मोजणीस विरोध करणार असल्याचा इशारा झालेल्या बैठकीत देण्यात आला. दर निश्चितीपूर्वी कोणतीही मोजणी मान्य नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडली. सांगोला येथील पंचायत समितीच्या बचत भवनात गुरुवार (दि.२६) रोजी शक्तीपीठ महामार्ग भूसंपादनासंदर्भात शासकीय अधिकाऱ्यांची व त्यानंतर शेतकऱ्यांची स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी, तहसीलदार संतोष कणसे, गटविकास अधिकारी कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव तसेच महसूल, कृषी, पाणीपुरवठा, एमएसआरडीसी व मोजणी करणाऱ्या मोनार्क कंपनीचे अधिकारी ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.
0 Comments