रायगड मध्ये जोरदार वादळीवाऱ्यासह पावसाचे थैमान
मुरुड (कटूसत्य वृत्त):- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम अलिबाग,पेण,रोहा, माणगांव,महाड, श्रीवर्धन, तळा, म्हसळा, पाली, खापोली, कर्जत, पोलादपूर, उरण, आणि कोकण किनार पट्टीवर झालेले दिसत आहेत. मुरुडच्या समुद्रकिनारी वादळी वाऱ्यासह पावसाने तालुक्यात अक्षरशः थैमान घातले, जिल्ह्यात मुरुड मध्ये सर्वाधिक ३७१ मि.मी.पावसाची नोंद झाली.लक्ष्मीखार भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरले तर दत्तवाडी,शिघ्रे,सायगांव परीसरात रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते, सायगाव पूल पाण्याखाली गेला होता, बोर्ली -मांडला,आगरदांडा,एकदरा,विहू रमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरून पाणी वाहत होेते.मोरेगावात जाण्यासाठी नवीन पूल बांधण्यात येत असून काढण्यात आलेला बाह्यवळण रस्ता वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला असल्याचे समजते.
पुढील ३-४ तासांत जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून काही भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यताअसून जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.हवामान विभागाच्या अंदाजानुसार २८ सप्टेंबर पर्यंत पावसाची स्थिती कायम राहील.असे कळविण्यात आले आहे.मुरुडमध्ये आज सकाळपर्यंत 371.00 मी.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत 530.00 मी.मी.इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
शहरात मध्यरात्री व सकाळच्या वेळी जोरदार वादळीवाऱ्यासह पावसाने लक्ष्मीखार येथील रस्त्यावर, अनेक घरांमध्ये पाणी शिरले.दत्तवाडी मंदिर परीसरात डोंगराचा भाग कोसळून रस्त्यावर पाणी येऊन रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते.बोर्ली येथे रात्री अकराच्या सुमारास रस्त्यावरुन पाणी वाहत होते.शिघ्रे, सायगाव रस्त्यावर पाणी येऊन रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते.सायगाव पूल पुर्णपणे पाण्याखाली गेला होता.एकदरा परीसरात राजपूरी रस्त्यावर पाणी साचले होते.यापरीसरातील संतोष भगत यांच्या घरामागील डोंगराचा भाग येऊन बुरुम माती खाली आली होती.आगरदांडा परीसरात दिघी पोर्ट रस्त्यावर तीन फूट पाणी साचले होते, त्यामुळे आगरदांडा गावात जाण्यासाठी नागरिकांनी नवीन कॉक्रीट रस्तयाचा वापर करण्याची सुचना ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आली होती.सुदैवाने कोणती दुर्घटना झाल्याचे वृत्त अद्याप हाती आले नाही.
0 Comments