Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्हा परिषदेस राज्यपाल यांचे हस्ते यशवंत पंचायत राज पुरस्कार प्रदान

 सोलापूर जिल्हा परिषदेस राज्यपाल यांचे हस्ते यशवंत पंचायत राज पुरस्कार प्रदान




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान  २०२३-२४  पुरस्कार वितरण कार्यक्रमात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे हस्ते सोलापूर जिल्हा परिषदेस तृतीय पुरस्कार देऊन सन्मानित करणेत आले. तत्कालीन सिईओ व उल्हासनगर महानगर पालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे, सोलापूर जिल्हा परिषदेचे सिईओ कुलदीप जंगम यांनी हा पुरस्कार स्विकारला. बक्षीस रक्कम १७ लक्ष रूपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  

यावेळी  ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कोकण विभागीय आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह या प्रसंगी सोलापूर जिल्ह्यातून व्यासपीठावर पुरस्कार स्विकारणे साठी अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी स्मिता पाटील, तत्कालीन उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे उपस्थित होते.

सोलापूर जिल्हा परिषदेचे गुणवंत कर्मचारी यांचा गौरव ..!

 गुणवंत कर्मचारी प्रदीप सकट व जगदीश मेटकरी यांचा देखील गुणवंत कर्मचारी म्हणून सन्मानित करणेत आले. याबद्दल सिईओ कुलदीप जंगम यांनी गुणवंत कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात
 स्थानिक स्वराज्य संस्थाचे योगदान महत्त्वपूर्ण
-  राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन
ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत  या संस्थांनी मोठे योगदान दिले असून  राज्यात प्रधानमंत्री आवास योजना व इतर गृहनिर्माण योजनेंतर्गत लाखो नव्या घरांच्या बांधकामास मान्यता मिळालेली आहे. ही गोष्ट अत्यंत समाधानकारक असून  मनरेगा, जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियान यासह विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
यावेळी ग्रामीण विकासासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन करत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता, ग्रामीण गृहनिर्माण, कुपोषण निर्मूलन, सामाजिक न्याय व कल्याण, महिला व बालकल्याण, तसेच पायाभूत सुविधा निर्माण या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण कार्य केले जात आहे.

 यंत्रणेच्या कृतीशील सहभागातून ग्रामविकास विभागाची यशस्वी घोडदौड
– ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून राज्यभरात उल्लेखनीय काम करण्यात येत असून यामध्ये यंत्रणेतील प्रत्येकाचा कृतीशील सहभाग आणि प्रयत्न यांचा वाटा निश्चितचं मोठा आहे. ग्रामविकास विभागाने विविध योजनांची प्रभावी अमंलबजावणी करत ग्रामीण जनतेला आरोग्य, शिक्षण, कुपोषण निर्मुलन, महिला बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण यासह विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत विभागाने पहिल्यांदाच विक्रमी घरकुलांना मान्यता देण्याची मोठी कामगिरी पार पाडत एकाच वेळी वीस लाख घरांची मंजूरी महाराष्ट्रात करुन दाखवली आहे, ही निश्चितचं कौतुकास्पद बाब आहे. तसेच मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत विभागाने लक्षणीय कामगिरी बजावली आहेच. याच पद्धतीने एकत्रित प्रयत्नांतून आणि समन्वयातून विभाग 150 दिवसाच्या कार्यक्रमातही उत्कृष्ट कामगिरी करुन दाखवेल याची खात्री असल्याचे श्री. गोरे यावेळी म्हणाले.

राज्यातील अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद सन 2023  - 24  मध्ये प्रथम पारितोषिक जि.प. वर्धा , द्वितीय पारितोषिक जि.प. अमरावती, तृतीय पारितोषिक जि.प. सोलापूर यांना  मिळाले आहे.  राज्यातील अत्युत्कृष्ट पंचायत समितीमध्ये  प्रथम पारितोषिक पं.स. नागपूर, द्वितीय पारितोषिक पं.स. जळगाव व तृतीय पारितोषिक पं.स. सांगली या जिल्ह्यांना मिळाले आहे.

यावेळी राज्यस्तरीय तसेच विभागस्तरीय जिल्हा परिषद, पंचायत समित्या, मंत्रालय (खुद्द) अधिकारी/कर्मचारी २०२२-२३, २०२३-२४ महाराष्ट्र विकास सेवा गट-अ २०२२-२३, २०२३- २४, जिल्हा परिषद कर्मचारी २०२२-२३, २०२३- २४, आर्दश ग्रामपंचायत अधिकारी २०२२-२३ व २०२३-२४ या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
Reactions

Post a Comment

0 Comments