'भोगावती'च्या पाण्यात वाढ
मोहोळ(कटूसत्य वृत्त):- मान्सूनचे मोहोळ तालुक्यात जोरदार आगमन झाले असून, रात्री दहा ते पहाटे दीड वाजण्याच्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील नरखेड मंडलात सुमारे चार तास जोरदार वारा - विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. नरखेड मंडलातील पर्जन्यमापकात ४२ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे भोगावती व नागझरी नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली. अनेक पिके
पाण्याखाली गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात पावसाने कहर केला असून जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडला आहे. शेजारील नगर जिल्ह्यात तसेच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, बार्शी, माढा तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मोहोळ तालुक्यातील सीना, भोगावती, नागझरी या नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी पावसाने गेल्या १०७ वर्षांचे रेकॉर्ड मोडले आहे.
जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. सोलापूरच्या इतिहासात मे महिन्यातील रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पंचनाम्याची मागणी जोर धरत आहे.
चौकट
वस्त्यांचा गावाशी संपर्क तुटला मोहोळ तालुक्यातील वाळुज कळमण रस्त्यावर भोगावती नदीवर पूल नसल्यामुळे वाळुज शिवारातील शेतीचे या नदीमुळे दोन भाग पडले आहेत. नदीच्या पुरामुळे शेतात जाण्या- येण्यास अडथळा निर्माण होत असल्याने वाळुजच्या नदीपलीकडील शेतकऱ्यांची जाधव वस्ती वसली आहे. मात्र नदीवर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात या वस्तीचा गावाशी संपर्क तुटतो. सध्याही तीच परिस्थिती आहे. लोकांना जाण्या- येण्यासाठी पोहून नदी पार करावी लागते तर विद्यार्थ्यांना होडीतून किंवा पाण्यातून पोहन जावे लागते. पावसाळ्यात नदीला अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात नदीकाठच्या शेतातील वस्तीवर बांधलेली जनावरे, पिके वाहून गेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाही.
0 Comments