बाहेरून आलेले भाजप हिताचा काय निर्णय करणार?
देशमुख यांनी लगावला टोला
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-जे लोक बाहेरच्या पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झाले आहेत, ते पक्षाचा हिताचा काय निर्णय करणार? सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमच्यामुळे विजय झाला आहे, असं त्यांना वाटत असेल. पण ते तसं नाही, असा टोला माजी पालकमंत्री तथा भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी लगावला आहे. देशमुख यांनी हा टोला नेमका कोणाला लगावला आहे, याची चर्चा मात्र सोलापूरच्या राजकारणात होताना दिसून येत आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्या पॅनेलने १३ जागा जिंकून बाजार समितीवर वर्चस्व मिळविले आहे. विरोधातील सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख यांच्या पॅनेलला तीन जागांवर समाधान मानावे लागले. या पॅनेलचे नेतृत्व सचिन कल्याणशेट्टी यांनी केले आहे, त्यामुळे विजयकुमार देशमुख यांचा रोख त्यांच्यावर तर नाही ना, अशी चर्चा रंगली आहे.
सचिन कल्याणशेट्टी यांचे वडील पंचप्पा कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. काँग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे यांचे विधानसभा निवडणुकीत त्यांनी काम केले होते. तसेच कल्याणशेट्टीही त्यावेळी म्हेत्रे यांच्या प्रचारात होते. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकाराने ते भाजपत परतले. याशिवाय, सचिन कल्याणशेट्टी यांच्या पहिल्या विजयातलाची कामगिरी बजावल्याचे सांगितले जाते. त्यामुळे विजयकुमार देशमुखांचा रोख कल्याणशेट्टींवर तर नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
देशमुख म्हणाले, ग्रामपंचायत मतदारसंघात मिळालेले यश हे अपेक्षितच होते. कारण, शेतकऱ्यांचा पाठिंबा आमच्या मागे आहे. सोसायटी मतदारसंघात वर्षानुवर्ष काही नेत्यांच्या स्वतःच्या कुटुंबातीलच सदस्य हे संचालक आहेत, यामुळे तेथील निकाल असाच लागणार होता. विरोधी पक्षातील निवडून आलेले संचालक एकत्र राहावेत आणि त्यांनी बाजार समितीत चांगले काम करावे, अशी अपेक्षा आहे, मात्र त्यांची प्रवृत्ती पाहता, तसे होणे शक्य नाही.
0 Comments