आयुष्यात मनासारखे जगता आले पाहिजे : डॉ. पांढरपट्टे
बार्शी : (कटुसत्य वृत्त ):- समाजातील इतर लोकांना त्रास न देता आपल्या आयुष्यात मनासारखे जगता आले पाहिजे, असे प्रतिपादन माजी आयएएस अधिकारी तथा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयामधील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे स्पर्धा मार्गदर्शन केंद्र आणि यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त 'आजची तरुणाई : संधी आणि आव्हाने' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निवृत्त आयएएस अधिकारी दिनकर जगदाळे हे होते. याप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार बापू शितोळे, प्राचार्य डॉ. अब्दुल शेख, डॉ. रामेश्वर कोठावळे, डॉ. बिरा पारसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे डॉ. पांढरपट्टे पुढे म्हणाले की, आपल्या मनासारखे जगता येणे इतका यशाचा संकुचित अर्थ घेऊ नये. तर समाजहिताचे काम करण्यासाठी स्वत:ला जे आवडते ते करणे म्हणजे यशस्वी होणे होय. तसेच आयुष्यात कोणती गोष्ट गांभीर्याने घेऊन नये, तर खिलाडूवृत्तीने आयुष्याकडे पाहिले पाहिजे. हुशार विद्यार्थ्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, असे त्यांनी मत व्यक्त केले. त्याबरोबर त्यांनी सामाजिक भान जागृत करण्यासाठी निवडक गझलांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांची मने जिंकली. अध्यक्षीय मनोगतात जगदाळे म्हणाले की, केवळ एमपीएससी हा यशस्वी होण्याचा मार्ग नाही. इतर क्षेत्रात स्वतःच्या पायावर उभे राहून यशस्वी उद्योजक होता येईल.
0 Comments