शेतकऱ्यांच्या ४० वर्षांच्या पाठपुराव्याला यश; आनंदाचे वातावरण
मोहोळ (कटुसत्य वृत्त):- आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक दोन या योजनेद्वारे बुधवारी (ता ५) दुपारी एक वाजण्याच्या मारास सारोळे तलावात पाणी सोडण्यात आल्याने सारोळे, खवणी व पोखरापूर या गावातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. गेल्या ४० वर्षांचा शेतकऱ्यांचा संघर्ष संपुष्टात आला. दरम्यान शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे व अन्य शेतकऱ्यांनी पाणी पडणाऱ्या वॉल्व्हचे व पाण्याचे पूजन केले.
खवणी, सारोळे, पोखरापूर या तीन गावातील शेतकऱ्यांनी आष्टी तलावातून पाणी देण्याच्या मागणीचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल केला होता. मात्र, अनेक अडचणींमुळे ही योजना रखडली होती. कधी निधीअभावी तर कधी राजकीय अनास्थेमुळे, मात्र शेतकऱ्यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला होता. यासाठी संघर्ष समिती ही स्थापन करण्यात आली होती. दरम्यान अनेक नेते मंडळींनी निवडणुकीच्या तोंडावर
या तलावातील पाण्याचे भांडवल करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनीही २०१८ पासून वेळोवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत पाठपुरावा केला होता.
दरम्यान दुपारी सव्वा एक वाजता आष्टी तलावातून पाणी सोडण्या आले. त्यावेळी जिल्हाप्रमुख चवरे पोखरापूरचे उपसरपंच आशिष आगलावे, अण्णा शिंदे, महादेव यमगर, किरण वाघमारे, महादेव नरोटे, रमेश बारसकर, अतुल लेंगरे, राहुल लेंगरे, तानाजी सावंत आदींसह अन्य शेतकऱ्यांनी पाण्याचे पूजन केले व सारोळ्याचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज की जय अशा घोषणा दिल्या.
चौकट
२० किलोमीटर अंतर
कनिष्ठ अभियंता सतीश चवरे म्हणाले, २० किलोमीटर अंतर पार करून हे पाणी सारोळे तलावात पोचले आहे. १५ इंच व्यासाच्या पाइपमधून पाणी येत आहे. सारोळेनंतर खवणी व नंतर पोखरापूर तलावात हे पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे पंधराशे एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
0 Comments