राज्य सरकारचा आणखी एक झटका यापुढे १०० आणि २०० रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर ५०० रुपये लागणार
मुंबई, (कटूसत्य वृत्त):- वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच आता राज्य सरकारने आणखी एक झटका दिला आहे. यापुढे १०० आणि २०० रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर ५०० रुपये लागणार आहेत. त्याची अंमलबजावणी १६ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे.
महाराष्ट्र मुद्रांक कायद्य सुधारणा करण्याचा अध्यादेश राज्यपालांनी सोमवारी जारी केला होता. या अध्यादेशाची अंमलबजावणी आजपासून सुरू आहे. यापूर्वी मुद्रांक शुल्कासाठी १०० आणि २०० रुपये द्यावे लागत होते. मात्र यावर बंदी घातल्याने आजपासून सर्व व्यवहार केवळ ५०० रुपयांच्या स्टॅम्पवरच करावे लागणार आहेत. त्यामुळे खतखरेदी आणि हक्क सोडण्यासाठी सुद्धा ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.
महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, १९९८ मध्ये सुधारणा करून प्रतिज्ञापत्र, करार आणि संबंधित कागदपत्रांवरील मुद्रांक शुल्क ५०० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मुद्रांक कायद्यातील सुधारणांमुळे राज्याला मुद्रांक शुल्क आणि नोंदणीतून सुमारे २ हजार कोटी रुपयांचा महसूल वाढण्यास मदत होईल. कारण मुद्रांक शुल्क हा राज्य सरकारच्या महसुलाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, असे महसूल विभागाचे म्हणणे आहे.
याआधी, खरेदी कराराची नोंदणी, सोडणे, डीड नोंदणी किंवा सदनिकांच्या विक्री व्यवहारासाठी १०० रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. मात्र, आता राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्काच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे कोणत्याही व्यवहारासाठी ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. नोटरीसाठी किंवा बँकेकडून कर्ज घेण्यासाठीही ५०० रुपये मोजावे लागणार आहेत.
0 Comments