रस्त्यासाठी उपोषण करणाऱ्या चळवळीतील युवकांचा गर्व वाटतो
.png)
अतुल खूपसे-पाटील यांच्याकडून कुगाव-चिकलठाण रस्त्यासाठी उपोषण करणारे युवकांचे कौतुक
कुरुल (कटूसत्य वृत्त):- शासन आणि प्रशासन हे मुर्दाड आहे. यांच्याकडून सहजासहजी कोणतीच कामे होत नाहीत आणि नसतात. शासनातील व प्रशासनातील गेंड्याची कातडी पांघरून झोपेचं सोंग घेणाऱ्या लोकांना जागं करण्यासाठी लोकशाहीचा मार्ग अवलंबून आंदोलनासारखे हत्यार उपसावे लागते. कुगाव ते चिकलठाण या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. मात्र युवकांनी चळवळ हातात घेतल्यामुळे प्रशासन वठणीवर आले असून शेतकऱ्यांच्या हितासाठी करमाळा तालुक्याला अशाच युवकांची गरज असल्याचे प्रतिपादन जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे-पाटील यांनी केले.
करमाळा तालुक्यातील कुगाव चिकलठाण रस्त्याच्या दुर्दशा झाली आहे याचे काम त्वरित चालू व्हावे यासाठी सचिन अनंतराव गावडे, शंकर रामचंद्र बोंद्रे, अविनाश मारुती सरडे, योगेश दत्तात्रय सरडे हे युवक उपोषणाला बसले. उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषण स्थळी तहसीलदार शिल्पा ठोकडे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांनी भेट देऊन काम उद्यापासून लगेच व उर्वरित पावसाची उघडीत मिळाल्यानंतर सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर युवकांनी उपोषण सोडले. या उपोषणकर्त्या युवकांचे कौतुक करताना खूपसे-पाटील पुढे म्हणाले की आंदोलनामध्ये मोठी ताकद आहे. परिस्थितीला झुकवण्याचे सामर्थ्य या आंदोलनामध्ये असते. प्रस्थापितांनी गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याच्या विकास कामांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केला आहे. सत्ताधाऱ्यांचे हे मोठे अपयश म्हणावं लागेल. मात्र युवकांची फळी अशीच मजबूत झाली तर शासन आणि प्रशासनाला वाकवायला वेळ लागत नाही. करमाळा तालुक्यातील युवकांनी हा आदर्श घेतला पाहिजे असे त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी धुळा भाऊ कोकरे, मंगेश बोंद्रे, मारुती गुटाळ, उपसभापती दत्ता सरडे, महादेव पोरे, महादेव कामठे, कैलास बोंद्रे, अक्षय सरडे, मारुती गावडे, इनुस सय्यद, महादेव अवघडे, बापू सरडे, विजय कोकरे, राणा वाघमारे, शरद सपाटे, जयसिंग पाटील यांच्या सह जनशक्तीचे पदाधिकारी कुगाव आणि चिखलठाण चे ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment