जुलै अखेर उजनी धरण प्लसमध्ये येणार दीड महिन्यात वाढले २१ टीएमसी पाणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण अद्याप मायनसमध्येच असून, प्लसमध्ये येण्यासाठी आणखी काही दिवसांची वाट पहावी लागणार आहे. उजनी सध्या उणे १९ टक्क्यांवर असून पावसाळा सुरू झाल्यानंतर ७ जून ते २३ जुलै या ४६ दिवसांत धरणात साधारणत: २१ टीएमसी पाणी वाढले आहे.
आता धरणात १५ हजार क्युसेक पाण्याची आवक आहे.
उजनी धरणाची पातळी उन्हाळ्याच्या शेवटी उणे ६० टक्क्यांपर्यंत गेली होती. ७ जूनपासून पावसाला सुरवात झाल्यापासून २३ जुलैपर्यंत धरणात पाणी यायला सुरवात झाली आणि सध्या धरण प्लसमध्ये येण्यासाठी आणखी साडेदहा टीएमसी पाणी अपेक्षित आहे. ७ जूनला उजनी धरणात केवळ ३१.५४ टीएमसी पाणी होते आणि आता धरणात ५३ टीएमसी पाणीसाठा आहे.
आता पुणे जिल्ह्यात कमी-अधिक पाऊस सुरू असल्याने उजनी धरणात विसर्ग वाढू लागला आहे. पुणे, नगर, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यांचे संपूर्ण लक्ष उजनी धरणाच्या पातळीकडे लागले आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिना संपला, तरीदेखील धरण परिसरात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. त्यामुळे सध्या पुण्यातील पावसावर उजनीची मदार अवलंबून आहे.
...तर उजनी धरण आठ दिवसात ओव्हर फ्लो
उजनी धरणाच्या वरील बाजूला घोड, चासकमान, पवना, मुळशी, खडकवासला, वडिवळे, कासारसाई, आंद्रा ही धरणे आहेत. पुणे जिल्ह्यातील पावसामुळे या धरणांची पातळी वाढत असून खडकवासला धरण ९० टक्क्यांहून अधिक भरले आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यातून नदी पात्रात कधीही पाणी सोडले जाऊ शकते, असा इशारा खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिला आहे. वडिवळे धरणातूनही सध्या पाच हजाराचा विसर्ग सोडण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील धरणे पूर्णक्षमतेने भरून उजनीत एक लाख क्सुसेकची आवक झाल्यास आठ दिवसातच उजनी १०० टक्के भरेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

No comments:
Post a Comment