नागपूर -गोवा शक्तीपीठ महामार्गाला शासनाची स्थगिती? शक्तीपीठ महामार्ग ११ जिल्ह्यांतून जाणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 21, 2024

नागपूर -गोवा शक्तीपीठ महामार्गाला शासनाची स्थगिती? शक्तीपीठ महामार्ग ११ जिल्ह्यांतून जाणार

 नागपूर -गोवा शक्तीपीठ महामार्गाला शासनाची स्थगिती? शक्तीपीठ महामार्ग ११ जिल्ह्यांतून जाणार



सोलापूर(कटूसत्य वृत्त);-लोकसभेतील पराभवानंतर महायुतीचा मोठा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत नागपूर ते गोवा ८०२ किलोमीटरचा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गास शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे महायुती सरकारने हा प्रकल्प तात्पुरता स्थगित ठेवला आहे.

वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड,परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या ११ जिल्ह्यांतून  जातो.या महामार्गाला स्थगिती देण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी राज्याच्या तिजोरीवर ८० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध होता. हा विरोध डावलून महाराष्ट्र सरकारकडून प्रकल्प राबवला जात होता. परिणामी लोकसभेतील पराभवानंतर या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार आल्यावर या प्रकल्पाबाबतन निर्णय घेईल, असं एका अधिकाऱ्याने माध्यमाशी बोलताना सांगितले आहे.

“या प्रकल्पातील बाधित शेतकरी आणि इतर ग्रामस्थ या प्रकल्पाला प्रत्येक जिल्ह्यातून विरोध करत असल्याचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे. किमान पुढील ३-४ महिने जमीन संपादित करू नयेत असे प्रशासनाला कळविण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर (ऑक्टोबरमध्ये) नवीन सरकार या प्रकल्पाचे भवितव्य ठरवेल”, असे या प्रकल्पाशी संबंधित एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

 शक्तीपीठ महामार्ग ११ जिल्ह्यांतून जाणार

या प्रकल्पाची पहिल्यांदा घोषणा सप्टेंबर २०२२ मध्ये करण्यात आली. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले होते. भूसंपादन करण्यासंदर्भात कलम १२ (२) ची अधिसूचना जारी केली होती.नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील पवनारला ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीशी जोडण्याचा हा महामार्ग  आहे. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या ११ जिल्ह्यांतून हा रस्ता जाणार आहे.

या. ११ जिल्ह्यांतील सर्व महत्त्वांच्या हिंदू धार्मिक तीर्थक्षेत्रांना हा रस्ता जोडणार होता. प्रकल्पासाठी आवश्यक ८ हजार ४१९ हेक्टरपैकी सुमारे ८ हजार १०० हेक्टर खाजगी शेतजमीन आहे. त्यामुळे जमीन हस्तांतरणासाठी शेतकऱ्यांकडून सातत्याने निदर्शने होत आहेत त्यास सत्ताधारी महायुतीसह राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे.

११ जिल्हयापैकी‌१० जिल्ह्यात पराभव

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शक्तीपीठ महामार्गातील ११ पैकी १० जिल्ह्यांमध्ये महायुतीचा पराभव झाला. आगामी‌ विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत.त्यामुळे महायुतीने सावध व बचावात्मक पवित्रा घेतला आहे. सर्वाधिक बागायत क्षेत्र असलेल्या कोल्हापुरात प्रकल्पाला होणारा विरोध हा कळीचा मुद्दा होता. प्रचारादरम्यान शेतकरी नेते आणि हातकणंगले येथील उमेदवार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला भूसंपादनाचा निर्णय न घेण्याचा इशारा दिला होता. निवडणुकीच्या निकालानंतर कोल्हापुरातील नवनिर्वाचित खासदार आणि पराभूत उमेदवारही या प्रकल्पाच्या विरोधात सामील झाले.

 सत्ताधारी व  विरोधकांचा प्रकल्पाला विरोध

मंगळवारी कोल्हापुरातील शेकडो शेतकरी या प्रकल्पाला विरोध करत रस्त्यावर उतरले. गेल्या आठवड्यात सत्ताधारी शिवसेना नेते संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना या प्रकल्पाविरोधातील निवेदन दिले होते.

“या रस्त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्याऐवजी ते यात्रेकरू केंद्रांना जोडण्यासाठी छोटे बायपास रस्ते तयार करू शकतात”, असे मंडलिक म्हणाले.

“कोणतीही मागणी लक्षात न घेता या रस्त्याचे नियोजन करण्यात आले असून यामुळे शेतजमिनी नष्ट होऊन शेतकऱ्यांचे हित धोक्यात येणार आहे”, असं शाहू महाराज म्हणाले होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनीही महायुतीच्या पराभवामागे शक्तीपीठ द्रुतगती मार्ग हे एक कारण असल्याचे सांगितले.

नांदेडचे भाजपाचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनीही शिंदे यांना पत्र लिहून त्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध कळवला आहे. “फक्त नांदेडमध्येच नाही तर प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी आंदोलन करत आहेत. याबाबत मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री दादा भुसे यांच्याशी बोललो आहे. त्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत काम थांबवण्याचे मान्य केले आहे”, असे खासदार अशोक चव्हाण म्हणाले.

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडून निषेध किंवा भूसंपादनाची प्रक्रिया थांबवण्याबाबत कोणताही लेखी अहवाल मिळालेला नाही. आम्हाला लिखित स्वरूपात काहीही मिळाल्याशिवाय आम्ही टिप्पणी करू शकत नाही. आम्हाला अद्याप काहीही मिळालेले नाही.

चार-पाच वर्षांपूर्वीच  नागपूर ते सोलापूर - रत्नागिरी महामार्ग  केंद्रीय रस्ते विकास  महामंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.त्याच रस्त्यास समांतर व पुरक महामार्ग महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे वतीने प्रस्तावित केला आहे. कोणाही नागरिकांची मागणी नसताना केवळ केंद्रीय ठेकेदारांच्या अटृहासामुळे हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जात आहे.-- भाई दिगंबर कांबळे,शेतकरी संघटना.

"शक्तीपीठ" या गोंडस‌ नावाने नागपूर ते गोव्याला जोडणाऱ्या ८०२ किमीचा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाचे काम तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी राज्याच्या तिजोरीवर ८० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाला ग्रामस्थांचा व शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे.प्रकल्पासाठी आवश्यक ८ हजार ४१९ हेक्टरपैकी सुमारे ८ हजार १०० हेक्टर खाजगी शेतजमीन आहे. त्यामुळे जमीन हस्तांतरणासाठी शेतकऱ्यांकडून सातत्याने निदर्शने होत आहेत .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages