शाळा वाचविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांनी आवाज उठवला पाहिजे - आ. प्रणिती शिंदे
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सरकारी शाळा बंद करून खासगीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे कदाचित शिक्षकांची ही शेवटची पिढी असू शकते. भावी पिढीला घडविण्यासाठी शिक्षकांचे खुप मोठे योगदान असल्याने शाळा वाचवण्यासाठी शिक्षकांनी संघटनेच्या माध्यमातून खासगीकरणाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही सदैव आपल्या पाठीशी राहू.असे आश्वासन "गुणवंत कर्मचारी पुरस्कार" वितरण सोहळ्याप्रसंगी आ. प्रणिती शिंदे यांनी दिले.
सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित जि. प. अल्पसंख्यांक अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी आ. शिंदे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, सरकारी कर्मचाऱ्यांचा जिथे आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. तिथे कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघटना पोटतिडकीने आवाज उठवते. चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्याचे संघटनेचे काम अभिमानास्पद आहे. भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची मार्गदर्शकाची भूमिका ही कौतुकास्पद आहे.यासाठी राज्यकर्ते,लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी देश व समाज घडविण्याच्या कामी शिक्षकांच्या सदैव पाठीशी राहूया.असे आवाहन आ. शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमात गुणवंत कर्मचाऱ्यांना आ. प्रणिती शिदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापूर होते. यावेळी मंचावर संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब शेख,सरचिटणीस हजरत शेख,राज्याध्यक्ष अशपाक बळोरगी, जिल्हा. महिलांना काँग्रेस अध्यक्ष शाहीन शेख, अल्पसंख्यांक काँग्रेस सेलचे नेते हाजी मैनोद्दीन शेख, अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हाध्यक्ष वसीम पठाण, एजाज शेख व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हजरत शेख यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार पल्लवी पवार यांनी मानले.

No comments:
Post a Comment