‘अग्निपथ’मुळे रेल्वेची सुरक्षा ‘ॲलर्ट’

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेला देशभरात विरोध होत आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात उग्र निदर्शने सुरू असून, बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये जाळपोळ झाल्याच्या घटना समोर येत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलकांनी गाड्या पेटवल्या आहेत. तर, भाजप नेत्यांच्या घरांवर हल्लेही होत आहेत. याचे पडसाद इतरत्रही दिसू लागले आहेत. त्याअनुषंगाने खबरदारी घेत सोलापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिस आणि शहर पोलिस असा मोठा तिहेरी बंदोबस्त लावण्यात आला आहे.
१७ ते २२ वर्षीय तरुणांना चार वर्षांसाठी लष्करात घेणार मग चार वर्षांनी त्या मुलांनी करायचे काय? ऐन उच्च शिक्षण घेण्याच्या कालावधीत मुलांना भरती करून घेणार व चार वर्षांनंतर त्यांचे भविष्य वाऱ्यावर सोडणार का, असा सवाल करत तरुणांच्या भविष्याशी खेळ करणारी व लष्कराचे कंत्राटीकरण करणारी केंद्र सरकारची ही योजना विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणणारी आहे. ही योजना रद्द करा, अशी मागणी करत १८ जून रोजी आंदोलन करणाऱ्यांना रेल्वे स्टेशन परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. याच पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर आणि परिसरात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही आणि येणाऱ्या समूहांवर आरपीएफ, जीआरपी तसेच शहर पोलिसांचा विशेष वॉच असणार आहे. त्याचबरोबर प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या गाड्यांमध्ये देखील गस्त घालण्यासाठी जवान तैनात करण्यात आले आहेत.
0 Comments