तरूण पिढीने औद्योगिक व साहित्यिक क्षेत्रात पुढे आले पाहिजे - नेताजी गोरे

बेंबळे (कटुसत्य वृत्त): पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या तरूणांनी साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात पुढे आले पाहिजे, लिहिते झाले पाहिजे असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे यांनी केले.
सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या वतीने नेताजी गोरे यांचा पंढरपूर मर्चंट बॅंक येथे संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष तथा बॅंकेचे संचालक किरण घाडगे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटिल,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, मराठा सेवा संघाचे पंढरपूर तालुकाध्यक्ष नितीन जाधव,माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, संभाजी ब्रिगेडचे पंढरपूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब बागल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नेताजी गोरे बोलत होते.
नेताजी गोरे यांनी पुढे सांगितले, तरूण वर्गाने योग्य प्रकारे आर्थिक नियोजन करून टप्प्या टप्प्याने आपली आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करावा. एकदम भलेमोठे कर्ज काढून लगेच यशस्वी होण्याचा धोका पत्करू नये. समाजातील तरुणांनी डोक्याच्या मालीश पासून बुटाच्या पॉलीश पर्यंत कोणतेही काम न लाजता केले पाहिजे हे मराठा सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष अॅड.पुरूषोत्तम खेडेकर साहेबांचे विचार आजच्या तरूणांनी अंगिकारून उद्योग, व्यवसायात उतरून स्वतः ची, कुटुंबाची पर्यायाने समाजाची प्रगती केली पाहिजे.पुरोगामी चळवळीतील तरूणांनी गोर गरीब समाज बांधवांसाठी सामाजिक कार्य करण्याची गरज आहे तसेच समाजातील यशस्वी उद्योजक, व्यावसायिक बांधव-भगिनींनी आपली संघर्षमय यशस्वी वाटचाल पुस्तक स्वरूपात लिहिली पाहिजे, त्यामुळे नवीन पिढीला उद्योग, व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असे मत व्यक्त केले. यावेळी रंजना श्रीकांत हासुरे लिखित महासम्राट बळीराजा या पुस्तकाचे वाटप उपस्थितांना करण्यात आले.
याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे माळशिरस तालुकाध्यक्ष दिगंबर मिसाळ, उपाध्यक्ष सचिन पारडे-पाटील, प्रहार औद्योगिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जगदाळे, संभाजी ब्रिगेडचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष दत्ता ताड, पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष महादेव पवार, विजय काळे, दादा मुळे, संतोष मुळे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment