न्यायालयीन इमारती व साधनसामुग्रीची उणीव भरून काढली जाईल : न्या. कर्णिक

माळशिरस न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण
माळशिरस (कटुसत्य वृत्त): जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर न्यायालयीन इमारतीची व साधनसामुग्रीची कमतरता जाणवत आहे आगामी काळात याची उणीव भरून काढली जाईल व त्यामुळे न्याय मागणाऱ्या लोकांना न्याय लवकर उपलब्ध होईल असे विचार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी व्यक्त केले. माळशिरस येथे न्यायालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन पायाभरणी प्रसंगी न्या कर्णिक बोलत होते. माळशिरस न्यायालया ची वास्तु लवकरात लवकर पूर्ण होईल व एक सुसज्ज व सर्व सोयींनी युक्त असे न्याय मंदिर न्यायदानासाठी उपलब्ध होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माळशिरस न्यायालयाचा इतिहास सांगताना माळशिरस वकील संघटनेने पूर्वी काढलेल्या "वाटचाल" या अॅड दत्तात्रय आडत व न्या हातरोटे यांनी संपादित केलेल्या स्मरणिकेचे आवर्जून उल्लेख करत अॅड सुभाष पाटील व त्यांचा लेख व अन्य लेखांचे बाबत आपल्या मनोगतात उल्लेख केला.
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश देशपांडे, माळशिरस येतील जिल्हा सत्र न्यायाधीश पाटील, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा चे सदस्य अॅड थोबडे, माळशिरस वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड खराडे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड विशाल पाटील यांनी व आभार प्रदर्शन ॲड मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
यावेळी माळशिरस वकील संघटनेचे उपाध्यक्ष सागर जाधव, पदाधिकारी रोहित उराडे, नितीन भोसले, विधी अधिकारी ऍड आडत, ऍड गोरवे तसेच सोलापूर जिल्हा व अन्य जिल्ह्यातून न्यायाधीश मंडळी, वकील मंडळी उपस्थित होते.
याप्रसंगी पंढरपूर वकील संघटना, इंदापूर वकील संघटना, माळशिरस वकील संघटना यांच्या वतीने उपस्थित न्यायाधीश व वकील मंडळींचा सन्मान करण्यात आला. तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, लोकप्रतिनिधी रणजितसिंह मोहिते पाटील, राम सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments