धर्माबरोबर शिक्षणाचा प्रचार आवश्यक : डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य
.png)
विश्वाराध्य विदयार्थी निलय स्नेहमेळावा संपन्न
पुणे (कटूसत्य वृत्त):- धर्माबरोबरच शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार गरजेचा आहे. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. आज देशात धर्मावरून राजकारण सुरु आहे हे कुठेतरी थांबायला हवे. यापेक्षाहि महत्वाचे म्हणजे समाजाचा कसा विकास होईल याकडे आपण सर्वांनी लक्ष देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
पुणे येथील श्री जगद्गुरु विश्वाराध्य विदयार्थी निलय अमृतमहोत्सवानिमित्त आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळावा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, नागपूरचे पोलिस उपायुक्त गजानन राजमाने, विश्वेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन अनिल गाडवे, ज्येष्ठ संचालक सुनील रुकारी, मंद्रुपचे रेणूक शिवाचार्य, काशी जंगमवाडी मठाचे प्रबंधक नलिनी चिरमे, सचिन चिरमे, पुणे येथील जंगमवाडी मठाचे व्यवस्थापक सुधाकर हलगणे, भरत उंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आजी आणि माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रख्यात गणिततज्ञ प्रा. डॉ. बसवराज मुडगी म्हणाले की, डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी धर्माच्या प्रचारासोबत सामाजिक काम करत समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यात निवाऱ्याची व्यवस्था केली. त्यामुळे अनेक गरीब, गरजू आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आले. त्यांनी मराठवाड्यातील दुर्लक्षित ग्रंथाचे प्रकाशन केले.
नागपूरचे पोलिस उपयुक्त गजानन राजमाने म्हणाले, निलयमध्ये राहिल्यामुळे माझ्यावर चांगले संस्कार झाले आणि चांगली शिस्त लागली. यामुळे सरकारी नोकरी करत असताना २१ नक्षलवादिंना अटक केले, ५ नक्षलवादीना शरण केले. ज्या गावात निवडणूक होत नव्हती तिथे निवडणूक घेतली. नागपूरची संघटित गुन्हेगारी संपवून टाकली. सरकारी नोकरी करताना कधीही भाष्टाचार केला नाही.
यावेळी श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य म्हणाले, दान हा खूप मोठा गुण आहे व्यक्तिलाही मोठा बनवतो. आपण विविध दान पाहिले आहेत. यात अन्नदान, विद्यादान, आर्थिक दान, कन्यादान आहेत परंतु विद्यादान हे आजीवन आनंद देत राहतो. आपण काम करत असताना सामाजिक भान ठेवणे आवश्यक आहे. कारण आपण समृध्द झालो आहोत तर इतरांचाही विचार आपण करायला हवा तरच देश प्रगतीपथावर जाईल. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रेयस उंबरकर यांनी केले आणि आकाश स्वामी यांनी आभार व्यक्त केले.
0 Comments