कॉपीचे प्रकार आढळले तर यापुढे त्या शाळांना दिले जाणार नाही परीक्षा केंद्र; वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय
मुंबई (कटुसत्य वृत्त ):-सध्या राज्यात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे ऑनलाइन पद्धतीने सुरु असलेल्या परीक्षा यावेळी ऑफलाइन होत आहेत. परीक्षा ऑनलाइन व्हाव्यात, यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील केले होते. दरम्यान परीक्षा सुरु असताना राज्यात काही ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचे प्रकार घडत आहेत. सध्या कोरोनामुळे शाळा तिथे केंद्र सुरु केले असताना कॉपीचे प्रकार आढळून येत आहेत. यामुळे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. परीक्षेदरम्यान पेपरफुटीची प्रकरणे आढळल्यास त्या शाळांची मान्यता काढून घेतली जाणार आहे. तसेच कॉपीचे प्रकार आढळले तर यापुढे त्या शाळांना परीक्षा केंद्र दिलं जाणार नाही अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत बोलताना दिली आहे. अहमदनगर आणि औरंगाबादमध्ये पेपरफुटीची प्रकरण आढळून आलेल्या शाळांची मान्यता काढून घेण्यात आल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. दहावीच्या मराठीची परीक्षा १५ मार्चला होती. कोरोनाची स्थिती असल्यामुळे आपण प्रत्येक शाळेला परीक्षा केंद्र केले. ज्या शाळेत गैरप्रकार सुरु असल्याचे आढळले, त्याची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे असे काही प्रकार होत असतील परीक्षे केंद्र रद्द करणे तसेच पुढे कधीही त्यांना केंद्र न देणे यासंदर्भातील निर्णय घेतल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
0 Comments