कडलास ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना सोडले वाऱ्यावर,डेंग्यू,चिकुन गुनिया ने नागरिक त्रस्त

सांगोला (कटूसत्य वृत्त):- कडलास या गावातील नागरिकांना डेंग्यू,चिकुन गुनिया या साथीच्या रोगाने पछाडले असून ग्रामपंचायतीने मात्र ग्रामस्थांना वाऱ्यावर सोडले असल्याची भावना काही नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती आमच्या प्रतिनिधीना दिली.त्यामुळे गावातील आरोग्य उपकेंद्र असून अडचण नसून खोळंबा असल्याची भावना या वेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. गावपुढारी,सरपंच,उपसरपंच आणि नव्याने स्थापन झालेली सदस्य कमिटी मात्र आपल्याच तोऱ्यात राहत असल्याचे या आजाराने बाधित झालेल्या अनेक महिलांनी सांगितले आहे.
कडलास येथील अनेक नागरिक,लहान मुले,वयोवृद्ध यांना सध्या साथीच्या रोगाचा सामना करावा लागत आहे. कडलास येथील आरोग्य उपकेंद्रातील कर्मचारी त्यांच्या परीने ही साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पण ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे आणि कराव्या लागणाऱ्या उपाययोजनेच्या अभावामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. नावापुरत्या मोकळ्या गटारी असलेल्या ठिकाणी फक्त निर्जुतिकीकरणाची पावडर टाकण्याचा प्रकार झाला आहे. अनेक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असता,अनेक सदस्यांनी त्याचा बंदोबस्त तुम्हीच करा,तुमच्याच हातात आहे,असा उपरोधिक सल्ला नागरिकांना दिला आहे. त्यामुळे अनेक नागरिक ग्रामपंचायतीच्या या कारभारावर नाराज आहेत.
सध्या सर्वत्र पावसाचे वातावरण निर्माण झालेले आहे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुद्धा झाला आहे तर काही ठिकाणी अजूनही सुरु आहे. सुखावह वाटणारा हा पाऊस येताच अनेक साथ आणि रोगांचे सुद्धा आगमन होत असते. अनेक ठिकाणी सध्या तापाची साथ सुरु आहे , पावसाचे पाणी जमल्याने अनेक ठिकाणी मच्छर पैदा होत आहेत आणि त्यामुळे डेंग्यू व चिकुन गुनिया सारख्या तापाची साथ येत आहे.चिकुन गुनिया हा एडिस मच्छर यांच्या चावण्याने होतो. डेंग्यू सारखीच लक्षणे ‘चिकुन गुनिया’ची सुद्धा दिसून येतात. त्यामुळे ग्रामपंचायतीने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गावस्तरावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

0 Comments