वाकी येथील वनविभागातील हजारो झाडे पाण्याविना लागली जळू
वरिष्ठ अधिकारी आणि वनपालाच्या दुर्लक्षामुळे वनसंपत्ती धोक्यात
सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला येथील वनविभागा अंतर्गत येत असलेल्या वाकी वन परिक्षेत्रातील हजारो झाडे पाण्याअभावी जळू लागली असल्याचे चित्र दिसून येत आहेत. सांगोला वनपरिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी,वनपाल आणि वनमजुरांच्या दुर्लक्षामुळे शासनाचे लाखो रुपये खर्चून लावलेली ही झाडे वाळून जात असल्याचे चित्र दिसत आहे.
वाकी ता सांगोला येथे वनविभागाचे जवळपास पंचवीस एकराहून अधिक क्षेत्र असून या मध्ये लहान मोठी हजारो झाडे शासनाच्या विविध योजनेंतर्गत लाखो रुपये खर्चून लावली आहेत. मध्यंतरी जोरदार झालेल्या पावसामुळे या वनविभागातील झाडे हिरवाईनी नटलेली होती.पण जसजसा कडक उन्हाळा जाणवू लागला,तसतसे या वन विभागातील वन संपत्तीकडे अधिकाऱ्यांचे, वनपालाचेआणि वन मजुरांचे दुर्लक्ष झाले असल्याचे स्थानिक पर्यावरणप्रेमींनी सांगितले आहे. या वन विभागात सागवान,लिंब,चिंच,वड,चंदन,करंज आदि प्रकारची हजारो झाडे सध्या वेळेवर पाणी मिळत नसल्याने जळत आहेत.या वन विभागातुन आचकदाणी,लक्ष्मीनगर,वाकी,खिलारे वस्ती येथील वाटसरूनी वाळलेल्या झाडांकडे आणि या वन संपत्तीकडे पाहून नाराजी व्यक्त केली आहे.
या वन विभागातील झाडे जगविण्यासाठी वन विभागाच्या वतीने झाडांना पाणी घालण्याचे काम तेथील स्थानिकांना दिले असून नेमून दिलेल्या पाण्याच्या खेपा होत नसल्याची तक्रार ही स्थानिक वृक्ष प्रेमींनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली आहे.उन्हाळा सुरू होण्याच्या अगोदरच झाडे जळत असतील तर वेळीच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देवून ही वृक्ष संपत्ती जगविण्याचा प्रयत्न करावा,अशी मागणी वृक्ष प्रेमी नागरिक करीत आहेत.या वेळी वन परिक्षेत्र अधिकारी बाठे साहेब यांना भ्रमनध्वनीवरून या संदर्भात विचारणा करण्यासाठी संपर्क साधला असता त्याचा संपर्क होवू शकला नाही.
0 Comments