'सरकारने ईडब्ल्यूएसचे आरक्षण दिलं नाही तर शिवसंग्राम कोर्टात जाणार'
रत्नागिरी : मराठा आरक्षणावरून संग्रामचे नेते विनायक मेटे यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे. जर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलं नाही तर शिवसंग्राम कोर्टात जाईल असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी सरकार आणि काही नेत्यांवरही टीका केली. मराठा आरक्षण स्थगितीचा फटका मेडिकल प्रवेशावर झाला आहे. यामुळे आर्थिक मागास दुर्बल घटकाचे म्हणजेच ईडब्ल्यूएसचे राज्य सरकारकडून आरक्षण मिळावे ही मागणी समोर येत आहे.
जर हे आरक्षण दिलं असतं तर मराठा समाज्याची जवळपास 600 मुलं मेडिकल प्रवेशापासून वंचित राहिली नसती. जे नुकसान झालं त्याला सरकारची निष्क्रियता आणि सरकारमधील काही मराठा समाज्याचे मंत्री यांच्यामुळे ही वेळ आल्याचा आरोप संग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. यावेळी सरकारने जर ईडब्ल्यूएसचे आरक्षण दिलं नाही तर शिवसंग्राम कोर्टात जाईल असा इशाराही विनायक मेटे यांनी दिला आहे.
विजय वड्डेटीवारांवर टीका
ओबीसी आणि मराठा समाजात तेढ कशी निर्माण होईल हे पाहण्याचे काम सत्ताधारी पक्षातले आणि सरकारमधील काही मंत्री करत असल्याचा आरोपही विनायक मेटे यांनी केला आहे. जे आऊटडेटेड झालेले नेते आहेत त्यांना पुढे करून सरकारमधील विजय वडेट्टीवारांसारखे नेते हे काम करत असल्याचा थेट आरोप विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
वीज बिलावरून सरकारवर आरोप
वाढीव वीज बिल देऊन सरकारने सर्वसामान्यांच्या खिशावर डाका घातला याचा आम्ही निषेध करतो. शंभर युनिट वीज आम्ही मोफत देवू असं आश्वासन देण्यात आलं होतं. ही घोषणा लांबच राहिली मात्र, अशा पद्धतीने वाढीव वीज बिल देणं अतिशय चुकीचं असल्याचं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले की, 'गोरगरिबांनी वीज वापरलीच नाही. त्यांना मात्र, भरमसाट बिलं पाठवली आणि जे मंत्री भरमसाट वीज वापरतात त्यांना वीज बिल नाही' हा दुजाभाव सरकार करत असल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केलाय. तसेच या प्रकरणी शिवसंग्रामसुद्धा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे. या बाबत दोन दिवसांत उर्जा मंत्र्यांशी आमची बैठक असल्याची माहिती विनायक मेटे यांनी दिली.
'गोंधळलेलं सरकार'
कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी सरकारडून सूचना करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे कोव्हिड सेंटर्स बंद करण्याचा सपाटा महाविकास आघाडी सरकारने लावला आहे. म्हणजे सरकारचं काय चाललं आहे हेच कळंत नाही. धोरण निश्चित नाही, निर्णय निश्चित नाही, त्यावरील अंमलबजावणी नाही. त्यामुळे हे गोंधळलेलं सरकार असल्याची टिका शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे.
0 Comments