Hot Posts

6/recent/ticker-posts

साखर उद्योग वाचविण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

साखर उद्योग वाचविण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट 

अकलूज(विलास गायकवाड) दि.८(क.वृ.): गेल्या चार पाच वर्षापासून राज्यातील साखर उद्योग अडचणीत आहे. या उद्योगाला वाचविण्यासाठी आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी या उद्योगाशी संबंधीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेवून हा उद्योग वाचविण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी केली.

५ ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्रीगटाचे प्रमुख अमित शहा व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतल्यानंतर आ मोहिते पाटील यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पेट्रोलियम व नॅचरल गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान व केंद्रीय ग्राहक संरक्षण व अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली . त्यांच्या समवेत दौंड विधानसभा क्षेत्राचे आ राहूल कुल हे होते.

सध्या जागतीक बाजारपेठेत साखरेला दर नाही. ३१०० ते ३११० या दरम्यान साखरेचे दर आहेत. तर शेतकऱ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या एफ आर पी प्रमाणे दर द्यावा लागतो. उस खरेदी , तोडणी वाहतूक , कामगार पगार व बॅंक कर्ज या सगळ्यांचा मेळ घालताना राज्यातील सहकारी साखर कारखानदारांना तारेवरची कसरत करावी लागते. केंद्र शासनाने १ ऑक्टोबर पासून उसाला २८५० रुपये एफ आर पी देण्याचा निर्णय घेतला आहे तर साखरेच्या चालू दरात २०० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी एफ आर पी ची रक्कम वाढली परंतु साखरेला १ ऑक्टोबर पासून २०० रुपये प्रतिक्विंटल वाढणारा दर मात्र जैसे थे आहे . तो वाढवून मिळावा अशी मागणी आ मोहिते पाटील यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण व अन्न पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली.

गतवर्षी इथेनॉल खरेदी करणाऱ्या कंपन्यांनी ५४ कोटी लिटर इथेनॉलचे टेंडर काढले होते. यावर्षी १०८ कोटी लिटरचे टेंडर काढले आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मितीला चांगले दिवस आले आहेत. सध्या बी हेवी इथेनॉलला ५४ . २७ रुपये , फायनल मोलॅसिस पासून निर्माण होणाऱ्या इथेनॉलला ४३ . ७० रुपये तर रसापासून इथेनॉल निर्मितीला ५९ . ५७ रुपये दर मिळत आहे. देशात व राज्यात यंदा उसाचे चांगले उत्पादन झाले आहे. त्यामुळे यंदा देशात ३१० लाख टन तर राज्यात १०० लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. साखर उत्पादन वाढले तर त्याचा साखरेच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे . देशाला २५० ते २६० लाख टन साखरेची गरज आहे. मागील गळीत हंगामातील २७३ लाख टन साखर देशात तर राज्यात ६२ लाख टन साखर शिल्लक आहे. त्यामुळे यंदा साखर कारखानदारांनी साखर उत्पादनापेक्षा इथेनॉल उत्पादनाकडे अधिक भर द्यावा. इथेनॉल उत्पादनामुळे देशात ३० लाख तर राज्यात १० लाख टन साखरेचे कमी उत्पादन होइल आणि हे उत्पादन देशांतर्गत साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होइल. यासाठी केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन द्यावे अशी मागणीही आ मोहिते पाटील यांनी केंद्रीय पेट्रोलियम व नॅचरल गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली. या मागणी बाबत दोन्ही मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आ मोहिते पाटील यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments