कोविडसंदर्भात राज्यात २ लाख ७७ हजार गुन्हे दाखल |

मुंबई, दि.६(क.वृ.): लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ७७ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. ३९ हजार ६६६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच विविध गुन्ह्यांसाठी २९ कोटी ९९ लाख १२ हजार ६८२ रुपये दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
- राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते ०५ ऑक्टोबर या कालावधीत
- पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३७० (८९८ व्यक्ती ताब्यात)
- १०० नंबरवर आलेले फोन – १ लाख १३ हजार ७१८
- अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४७
- जप्त केलेली वाहने – ९६,५४७
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात राज्यातील २२८ पोलीस व २५ अधिकारी अशा एकूण २५३ पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला.
पोलिसांना कोरोनासंदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
0 Comments